
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपामधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही मित्रपक्षांतील मतभेद सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समन्वय समिती निष्फळ ठरल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही दोन्ही पक्षांमधील नाराजी कायम असल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, समन्वय समितीच्या बैठकीनंतरही काल सुधार समितीतून भाजपच्या नगरसेवकांनी, तर स्थायी समितीतून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. यामुळे सत्तेतील दोन्ही भागीदार पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत फेब्रुवारी महिन्यात सत्ता स्थापन झाल्यापासूनच दोन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद समोर येत होते. हे मतभेद मिटवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती, परंतु तिची पहिलीच बैठक अयशस्वी ठरल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. समन्वय समिती फेल झाल्याने आगामी काळात हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply