
Two Girls Marriage In Patna : प्रेमात व्यक्ती काय करेल काहीही सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे दोन मुलीचं एकमेकींवर प्रचंड प्रेम होतं आणि दोघांनी पळून लग्न केलं… ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे घडली आहे. त्या दोघांमधील प्रेम इतकं होतं की, त्यांनी केवळ सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं झुगारून दिली नाहीत, तर धर्माची बंधनंही तोडली आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या धर्मातील दोन मुली गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. अखेर त्यांनी घरातून पळून एका मंदीरात लग्न केलं. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं आहे की, दोन्ही मुली शेजारी राहतात आणि एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत, यामधील एक महिला 10 वी इयत्तेत शिकत आहे, तर दुसरी मुलगी 12 वी इयत्तेत शिकत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 10 वीत शिकणाऱ्या मुलीचे वडील सीआयडीमध्ये कार्यरत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, मुलींनी कायमच त्यांच्या नात्याचं लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतलेला. अशात मुली 7 ऑगस्ट रोजी कोणालाच न सांगता घरातून पळाल्या. दोघींनी एका स्थानिक मंदिरात लग्न केलं आणि दोघी हॉटेलमध्ये राहिल्या. मुली घरातून निघाल्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त 3 हजार 500 रुपये होते.
दोन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी पाटण्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं. पाळत ठेवून पोलिसांनी खगरिया स्थानकाजवळ दोन्ही मुलींना सुखरूप शोधून काढलं आणि त्यांना पाटण्याला परत आणलं.
पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील मुली त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्या दोघांनीही पोलीस आणि आपल्या कुटुंबीयांसमोर स्पष्टपणे सांगितलं की, ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि यापुढे कधीही वेगळ्या होणार नाहीत. दोघींपैकी कोणालाही आपापल्या कुटुंबीयांसोबत घरी जायचं नव्हतं.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान एक तरुणी सज्ञान आणि दुसरी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी या दोघींनाही न्यायालयात हजर केलं. न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन मुलीला सुरक्षितता आणि देखभालीसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर सज्ञान तरुणीला मात्र तिच्या पसंतीच्या ठिकाणी राहण्याचेआणि जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न्यायालयाने दिले आहेत.
Leave a Reply