
जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून, परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यांतील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातपुडा पर्वतरांगांमध्येही पावसाचा जोर कायम असून, मुक्ताईनगर येथील कुंड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे काकुडा नदीला पुन्हा पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply