
अभिनेता कुणाल खेमू हा लवकरच त्याचा ‘व्हाइब’ हा चित्रपट घेऊन येतोय. पण या चित्रपटाची खासियत म्हणजे यात त्याच्या सासूबाई आणि दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर देखील जळकणार आहेत. या चित्रपटाद्वारे शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या जावयासोबत काम करणार आहेत. चित्रपटात शर्मिला एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहेत. कुणालसाठी हा चित्रपट आणखी एका कारणामुळे खास आहे. कारण या चित्रपटात तो केवळ अभिनय करणार नाहीये, तर त्याने दिग्दर्शनाची जबाबदारीही स्वतः सांभाळली आहे. यापूर्वी कुणालने ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. म्हणजेच दिग्दर्शक म्हणून ‘वाइब’ हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.
शर्मिला टागोर यांना कसं मनवलं ?
या चित्रपटात शर्मिला टागोर हा रोल करतील हे पहिल्यापासून ठरलेलं नव्हतं, असं या मूव्ही ट्रेलर लाँच इव्हेंटच्या वेळेस कुणालने सांगितलं. त्याने सर्वात पहिले शर्मिला यांना या चित्रपटात छोटीशी भूमिका म्हणजेच कॅमिओ करण्याबाबत विचारलं होतं. त्यानंतर शर्मिला यांनी आधी चित्रपटाची कथा आणि त्याचा सारांश म्हणजेच सिनॉप्सिस मागितला. मात्र कुणालच्या मते, शर्मिला यांना कदाचित आधीच समजलं होतं की त्यांना ही भूमिका करायचीच आहे. अखेर शर्मिला यांनी या चित्रपटासाठी होकार दिला. कुणालच्या म्हणण्यानुसार, शर्मिला टागोर यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करणे हीदेखील त्याच्यासाठी मोठी संधी आहे. त्याने सांगितलं की, एक दिवस आपल्याला शर्मिला यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीला ‘अॅक्शन’ आणि ‘कट’ म्हणण्याची संधी मिळेल, असा विचारच त्याने कधीच केला नव्हता. त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी खूप खास असल्याचं त्याने नमूद केलं.
चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला कुणालची पत्नी आणि अभिनेत्री सोहा अली खान देखील उपस्थित होती. यावेळी तिने कुणालच्या विनोदी स्वभावाचे कौतुक केलं. सोहाने गंमतीने सांगितले की, लग्न असो किंवा अंत्यसंस्कार, कुणाल कोणत्याही प्रसंगी लोकांना हसवू शकतो. तिच्या मते, दोन्ही कुटुंबांमध्ये कुणाल हा सर्वात जास्त विनोदी आहे.
प्रीती झिंटाचीही भूमिका
या चित्रपटात प्रीती झिंटाहीची महत्वाची भूमिका आहे . मात्र, तिची भूमिका खूप गंभीर स्वरूपाची आहे. प्रीतीने गंमतीने कुणालकडे तक्रारही केली होती. कॉमेडी चित्रपट असूनही कुणालने तिला फारसे मजेदार सीन्स दिले नसल्याचं तिने म्हटलं होतं.
‘व्हाईब’ मध्ये कुणाल खेमू, प्रीती झिंटा आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्यासोबत वंशिका धीर, यशपाल शर्मा आणि भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती चिराग निहलानी यांनी केली आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply