
Russia And Ukraine War : गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न झाले. परंतु अजूनही हे युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही समाधानकारक पर्याय न सापडल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. दरम्यान, आता हे युद्ध संपवण्यासाठी भारताची एन्ट्री झाली आहे. आम्ही हे युद्ध थांबवण्यासाठी तयार आहोत, असं भारताने म्हटलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर युक्रेनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी युद्धाबाबत ही भूमिका घेतली आहे. त्यामुळेआता भारत युद्ध मिटवण्यासाठी काहीतरी महत्त्वाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमध्ये मध्यस्थ म्हणूनही काम करू शकतो
एस जयशंकर युक्रेनच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध समाप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. गरज पडलीच तर भारत या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थ म्हणूनही काम करू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. न्यूज एजन्सी रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. एस जयंशकर यांनी आपल्या युक्रेन दौऱ्यात युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांचीही भेट घेतली. या भेटीत काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांवर चर्चा केली. जयशंकर हे अजूनही युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?
जयशंकर यांच्या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयानेही निवेदन दिले आहे. जयशंकर युक्रेनचे समकक्ष आंदी सिबिहा तसेच पोलंडचे उपपंतप्रधान क राडोस्लाव सिकोरस्की यांच्यासोबत चर्चा करतील. आपल्या चर्चेत द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट करणे, दोन्ही देशांच्या हितावर चर्चा करणे या मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान घडवून आणणे हा उद्देश असेल असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
युक्रेनने केले जयशंकर यांचे स्वागत
दरम्यान, एस जयशंकर हे युक्रेनच्या दौऱ्यावर जाणारे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांचे युक्रेनने मोठ्या उत्साहात स्वागत केले. एकीकडे रशियाकडून आमच्यावर हल्ले केले जात आहे. आमची जहाजे लक्ष्य केली जात आहेत. असे असताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनचा दौरा केला. त्याबाबत मी त्यांचे कौतुक करतो, असे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे आता भारत खरंच हे युद्ध संपवण्यासाठी काही करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply