
कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी सार्वजिनक ठिकाणी आयोजित केलेल्या पंगतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. कोणत्याही ठिकाणी पंगत किंवा जेवणाचा कार्यक्रम किंवा लग्नाच्या जेवणासाठी केटरर्सला कार्यक्रमाच्या सात दिवस आधी FDA च्या अधिकाऱ्यांची परवानगी असणे गरजेचे असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लग्नाच्या जेवणासाठी परवानगी घ्यावी लागणार
भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, महाप्रसाद आणि लग्नातल्या जेवणासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं नवी नियमावली जाहीर केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी हा निर्णय घेतला आहे. सामूहिक जेवण आयोजित करताना आयोजकाला 7 दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नाच्या जेवणासाठीही ही परवानगी घ्यावी लागणार असून ही परवानगी केटरर्स घेतील. केटरर्सला कच्चा माल कुठून घेतला याची माहिती द्यावी लागणार आहे.
केटरर्ससाठी नियम
समोर आलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी लागणाऱ्या परवानगीत वधू-वर किंवा त्यांच्या पालकांचा समावेश असणार नाही. ही परवानगी केवळ लग्नात जेवण बनवणाऱ्या केटरर्ससाठी असणार आहे. केटरिंग करणाऱ्याला संबंधित जेवणासाठी माल कुठून खरेदी केला याची माहिती द्यावी लागणार आहे. कोणत्याही कार्यक्रमावर बंधन आणणं हा हेतू नसून अन्नाची सुरक्षितता हाच हेतू असल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. दूध, खवा, पनीर, तूप, मिठाई, सुकामेवा, बर्फ, पाणी, खाद्यरंगावर विशेष लक्ष असणार आहे. नियमभंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होतील अशी माहितीही मुंढे यांनी दिली आहे.
सण उत्सवांसाठी खास नियम
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील नागरिकांना सणांच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईद, होळी आणि बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची तपासणी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी FDA ने व्यापक यंत्रणा तयार केली आहे.
तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, ‘ईद असो किंवा दिवाळी, सणांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी अन्न मिळाले पाहिजे.’ महाराष्ट्रात ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ ही संकल्पना राबवली जात असून, सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे 3 सप्टेंबरपासून वर्षभरातील सण-उत्सव लक्षात घेऊन अन्न सुरक्षा कारवाईचा विशेष ॲक्शन प्लॅन लागू केला जाणार आहे. या योजनेत कोणत्याही एका धर्माच्या सणाला वेगळे नियम नसतील. सर्व धर्मीय समुदायांचे सण आणि कार्यक्रम एकाच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समान पद्धतीने तपासले जाणार आहेत.
Leave a Reply