
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेत फूट का पडली? याचं कारणच आज कोर्टाला सांगितलं. यावेळी त्यांनी पहिल्याच युक्तिवादात काँग्रेस आणि भाजपचा उल्लेख केला. भाजपसोबत युती करून विधानसभेची निवडणूक लढली गेली. निकाल आल्यानंतर ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली त्यांच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यात आली. त्यामुळे पक्षात असंतोष होता आणि त्यातूनच पक्षात उठाव झाला, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कौल यांनी युक्तिवाद केला.
निवडणुका भाजप सोबत लढल्या मात्र नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यांच्याविरुद्ध निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत नंतर युती केली गेली. त्यामुळे पक्षातून उठाव झाला. ठाकरे काँग्रेससोबत गेले म्हणून पक्षात असंतोष होता हीच आमची भूमिका आहे, असं वकील नीरज कौल म्हणाले.
आमचीच शिवसेना खरी
विचारसरणी आणि विरोधी पक्षाच्या युतीमुळे पक्षात फूट पडली, असे सांगतानाच आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष एकच असल्याचा दावाही कौल यांनी आजच्या सुनावणीवेळी केला.
तर तुम्ही पक्ष काय चालवणार?
ठाकरेंचा युक्तिवादच चुकीच्या मुद्द्यांवर आधारे करण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल केले गेले. पक्षाची रचना एका व्यक्तीच्या मर्जीनं झाली होती. एका सहीनं जर जबाबदारी मिळत असेल तर कार्यकर्त्यांचे महत्त्व काय? असा सवाल करतानाच जर तुम्ही पक्षात लोकशाही मार्गाने निवडणूक घेऊ शकत नसाल तर तुम्ही राजकीय पक्ष काय चालवाल? निवडणुका कशा लढाल? पक्षांतर्गत निवडणुका घेतल्याचं पाहिजेत, असा युक्तिवादही त्यांनी केला.
पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी
दरम्यान, पुढील सुनावणी 15 सप्टेंबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत कौल यांनी पक्षाची फूट, पक्षाची घटना आणि पक्षातील मनमानी त्यातून झालेला उठाव आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पुढच्या सुनावणीत कौल हे अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचे आधार तसेच राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यावर युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.
Leave a Reply