
कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. त्यामुळे रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. रोहित पवार यांना क्लीनचीट दिली गेली असून ईडीने ती फाईल बंद केली आहे. मात्र आता याच मुद्यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. रोहित पवारांना क्लीनचीट मिळाली, हे कसले संकेत आहेत, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“त्या (शिखर बँक घोटाळा) केसमध्ये सुनेत्रा ताई पवारांचंही नाव होतं ना. मग त्यांना जर क्लीनचीट द्यायची असेल तर यांनाही ( रोहित पवार) द्यावी लागेल, साधा सोपा विषय आहे. त्या केसमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव आहे, मग जर त्यांना तुम्हाला सोडवायचं असेल तर इतरांना तुम्हाला आरोपी करता येणार नाही”, असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजपावर टीकास्त्र
दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी यावेळेस भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महिला आरक्षण बिल नामंजूर झाल्यावर भाजपने राज्यात जनआक्रोश मोर्चा काढला. मुंबईत जांबोरी मैदान परिसरात त्यामुळे एकच गर्दी झाली. वाहतूक खोळंबा झाल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. एका महिलेच्या संतापाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांनाही सामना करावा लागला होता. त्यावर आज गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली होती, यापूर्वी असे मोर्चे निघाले नाहीत का? मोर्चेकरांमुळे 50 किलोमीटरपर्यंत हायवे जॅम झालेले पाहिलेले आहेत अशी प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा वाद ओढवला होता. त्या महिलेने जी भाषा वापरली ती योग्य नव्हती, असंही ते म्हणाले होते. जे आयोजक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, असंही सांगण्यात आलं.
याच मुद्यावरून राऊतांनी गिरीश महाजन तसेच भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोर्चाचे आयोजक काय काँग्रेस पक्ष होता की मुस्लिम लीग होता ? तुम्हीच (भाजप) आयोजन होता ना ? स्वत:विरुद्धच गुन्हा दाखल करताय, माफी मागा महाराष्ट्राची. एकतर तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलून मोर्चा काढताय, महिलांना भ्रमित करताय. महिला आरक्षणाचा कोणताही विषय नसताना त्याच आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही मोर्चा काढता, रस्ते बंद करता, लोकांना अडचणी निर्माण करता, अशी टीका राऊतांनी केली. त्या महिलेने शेकडो महिलांची प्रतिनिधी बनून संताप व्यक्त केला, त्या संतापामागचं भावना आणि कारण समजून घेतल्या पाहिजेत, असंही राऊत म्हणाले.
मोर्च्यामध्ये आम्ही असतो तर आत्तापर्यंतकारवाई झाली असती, त्या मोर्चामध्ये अनेक मंत्री होते, तुम्ही (पोलिस) काय कारवाई करणार, असं म्हणत मोर्चाला परवानगी का दिली, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. आम्हाला मोर्चासाठी 100 वेळा उंबरठे झिजवावे लागतात, मग पोलीस आयुक्त यांच्याकडे मीटिंग होईल, मग गृहखात्याला विचारतील. मग गृहखातं, मुख्यमंत्र्यांची परवानगी घेईल मुंबईत असल्यामुळे नगर विकास खात्याचे परवानगी लागेल का, असा तो कागद फिरतो पुन्हा तो महापालिकेकडे कागद येणार. पण यांच्याकडे 24 तासात परवानगी मिळाली, असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.
Leave a Reply