
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीतून हलवून गुजरातच्या केवडिया येथे होणार आहे. दिल्लीचे महत्त्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी म्हटले की, देशाच्या आर्थिक राजधानीचे म्हणजेच मुंबई शहराचे महत्त्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे देशाच्या राजधानीचे महत्त्व हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुरस्कार सोहळ्याचे स्थळ हलवायचेच होते, तर ते मुंबईत का आणले नाही, असा थेट सवाल त्यांनी विचारला. ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला, त्या महाराष्ट्रात हा पुरस्कार सोहळा का नाही, असेही त्यांनी नमूद केले.
स्वतःला काही निर्माण करता आले नाही की नाव बदल, स्थळ बदल अशाप्रकारे भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले. केंद्रातील दोन सत्ताधीशांचा “उरलो तर गुजरातपुरते” हा अट्टहास दिसतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. यामुळे महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. हा निर्णय केवळ राजकीय हेतूने घेतल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.
Leave a Reply