
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा इथं अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर आणि महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी केलेल्या समन्वयानंतर भाविकांना पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला. आज (शुक्रवार 28 ऑगस्ट) सकाळी 6 वाजता सर्व भाविक सागा इथून न्यालम चेक पोस्टच्या मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण झाल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना ते तिबेटमधील सागा इथं अडकले.
दरम्यान, काठमांडूहून त्यांच्या परतीच्या विमानाचं बुकिंग 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आलं होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वेळेत काठमांडू गाठणं आवश्यक होतं. मात्र, सागामध्ये अडकल्याने भाविकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. सागामध्ये अडकलेल्या भाविकांची माहिती समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. भाविकांना सुरक्षितपणे काठमांडूपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधत पत्रव्यवहार आणि समन्वय सुरू केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही या प्रकरणात तत्परतेने आवश्यक मदत आणि सहकार्य केल्याने भाविकांच्या पुढील प्रवासाचा मार्ग सुकर झाला.
सर्व प्रयत्नांना यश आलं असून 37 भाविक सागा इथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत काठमांडू गाठून 29 ऑगस्टच्या नियोजित विमानाने हे भाविक मायदेशी परतण्याची शक्यता आहे. संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर कैलास मानसरोवर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबाबत चिंता अधिक वाढली होती. रस्ते आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून अनेक यात्रेकरूंना परतीच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Leave a Reply