
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढत असून, पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे दुपारच्या वेळी कडक उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, शहरातील दैनंदिन हालचालींवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.
विशेषतः मरीन ड्राइव्ह (Marine Drive) परिसरात नेहमीप्रमाणे असलेली गर्दी सध्या कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांना पडदे लावावेत, शक्यतो घरात राहावे आणि बाहेर पडताना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा उन्हात एकटे सोडू नये, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नियमित तपासावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकूणच, वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
Leave a Reply