
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून, चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या जरांगे पाटील यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी उपचारांसह वैद्यकीय तपासणी करण्यासही नकार दिला आहे.
उपोषणस्थळी रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक दाखल झाले होते. पहिल्यांदा आरोग्य विभागाचे पथक जरांगे पाटील यांची तपासणी आणि उपचार करण्यासाठी पोहोचले; मात्र त्यांनी उपचार नाकारल्याने पथकाला परतावे लागले. त्यानंतर रात्री सुमारे १.१५ वाजता डॉक्टरांचे पथक पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले. बराच वेळ डॉक्टरांनी तपासणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्यांदाही जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार दिला. रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी झाल्याने उपचारांची नितांत आवश्यकता असल्याचा अहवाल वैद्यकीय पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यांच्या मागण्यांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार नसल्याने प्रशासन आणि सरकारसमोर त्यांना वैद्यकीय उपचार देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply