
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक राजकीय धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)चे वरिष्ठ खासदार सौगत रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा संसदेच्या कँटीनमधील एक फोटो समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत एका टेबलावर दिसत असल्याने त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या अटकळींना उधाण आलं आहे. त्यामुळे ममता यांना आणखी एक मोठा झटका बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोबाबत विचारले असता शत्रुघ्न सिन्हा यांनी नड्डा हे आपले जुने मित्र असल्याचे सांगितले. तर सौगत रॉय यांनीही स्पष्टीकरण देत कोणत्याही पक्षांतराची शक्यता फेटाळून लावली आहे.
कँटीनमध्ये अमित शाह किंवा जे. पी. नड्डा यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. “आम्ही आधीपासून त्या टेबलावर बसलो होतो. अमित शाह आणि भाजपचे आणखी एक नेते काही वेळासाठी तिथे आले आणि नंतर निघून गेले. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं रॉय यांनी स्पष्ट केलं. आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. उलट भाजपचे लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत. आम्ही तर एनडीएमध्ये गेलेल्या लोकांना पुन्हा परत येण्याचे आवाहन करत आहोत.” असंही त्यांनी नमूद केलं.
नड्डा माझे जुने मित्र
द टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी भाजप नेते आणि सध्याचे टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. नड्डा हे त्यांचे जुने मित्र असल्यामुळे ते त्यांच्यासोबत बसले होते, असंही सिन्हा यांनी सांगितलं.
काकोली घोष यांचा तिखट हल्ला
मात्र, संसद किंवा विधानसभेत सामाजिक भेटीदरम्यान अशा प्रकारचे फोटो काढले जाणे ही सामान्य बाब आहे आणि त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि बेलेघाटाचे आमदार कुणाल घोष यांनी म्हटलं. “अशा अफवांना काही अंत नाही. याचा आमच्या विचारसरणीशी किंवा राजकारणाशी काहीही संबंध नाही.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी या वादात अधिक भर घालत सौगत रॉय यांचे हे जेवण एखाद्या आखीव-रेखीव ‘डबल ट्रॅक’ रणनीतीचा भाग असू शकते, असा संकेत दिला. “मी ते फोटो बारकाईने पाहिलेत. कदाचित ते काही योजना आखत असतील. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ते थेट चर्चा करत आहेत. राजकारणात असचं घडत असते. ही एक प्रकारची ‘डबल ट्रॅक’ रणनीती आहे” असं घोष म्हणाल्या.
Leave a Reply