
‘बिग बॉस 20’च्या घरात अभिनेत्री माही विजने एण्ट्री घेतल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहीने या मुद्द्यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. माही विज आणि जय भानुशाली यांनी तब्बल 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर होण्याचा निर्णय जाहीर केला.
दोघांनीही हे नातं कोणत्याही कटुतेशिवाय संपवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत माहीने स्पष्ट केलं की, ती बिग बॉसच्या घरात जयसोबतच्या विभक्त होण्याबद्दल चर्चा करणार नाही.
तिच्यासाठी हा विषय अत्यंत वैयक्तिक आहे आणि तो सार्वजनिक चर्चेचा विषय बनवण्याची तिची इच्छा नाही. तिच्या मते, आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या स्वतःपुरत्या ठेवणं अधिक योग्य असतं. विशेष म्हणजे विभक्त झाल्यानंतरही मुलांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ती जयसोबत चर्चा करून घेत असल्याचं तिने सांगितलं.
माहीने यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की, तिचं आणि जयचं नातं संपलं असलं तरी मुलांच्या बाबतीत दोघेही आपली जबाबदारी पार पाडतील. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय शांततेने आणि परस्पर संमतीने घेतला असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं होतं. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय माहीसाठी सोपा नव्हता. विशेषतः मुलगी ताराला सोडून अनेक दिवस घरापासून दूर राहण्याची कल्पना तिच्यासाठी भावनिक होती.
माहीने हेही स्पष्ट केलं की, ‘बिग बॉस’मध्ये येण्यामागे तिचा उद्देश केवळ अभिनयाच्या करिअरला पुन्हा सुरुवात करणे नाही. तिला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं आणि यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं तिला जाणवलं. आता बिग बॉसच्या घरात माहीचा स्पष्टवक्तेपणा आणि तिची दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा ती या शोमध्ये स्वतःचा गेम कसा खेळते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.





Leave a Reply