
दुबईत 2021 साली टी 20 वर्ल्ड कप झाला. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. वनडे आणि T20 या दोन प्रकारात वर्ल्ड कप टुर्नामेंट होते. पाकिस्तानने कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये भारतावर मिळवलेला हा पहिला आणि एकमेव विजय आहे. आज पाकिस्तान क्रिकेटमध्ये जे संकट आहे, त्यासाठी हा विजय जबाबदार आहे असं पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटपटू मोहम्मद युसूफच मत आहे. या मॅचआधी पाकिस्तानने कधीही वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारताला हरवलं नव्हतं. बाबर आझमने नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 79 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता भारताचं 152 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. पाकिस्तान क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण होता.
या विजयामुळे पाकिस्तान क्रिकेटपटूंची विचार करण्याची पद्धत बदलून गेली असं मोहम्मद युसूफ यांना वाटतं. या विजयामुळे खेळाडूंचा अतिआत्मविश्वास वाढला. पुढे काय करायचं हे त्यांना समजलं नाही असं मोहम्मद युसूफने म्हटलय. “2021 मध्ये भारताविरुद्ध आम्ही तो जो सामना जिंकला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचं भरपूर नुकसान झालं. कारण त्या विजयानंतर खेळाडूंना असं वाटू लागलं की, आम्ही बरच काही मिळवलय. पुढे काय करायचय हेच त्यांना समजत नव्हतं. जेव्हा तुम्ही चांगलं करताय, तेव्हा विनम्र असलं पाहिजे. तुम्ही वर्तणूक बदलली, तुम्ही अनादर करणं सुरु केलं, तर समस्या निर्माण होतात. पाकिस्तान क्रिकेटमध्ये तेव्हापासूनच अडचणी सुरु झाल्या” असं मोहम्मद युसूफने समा टीव्हीशी बोलताना सांगितलं.
बरेच कोच आले आणि गेले
त्या लोकप्रिय विजयानंतर पाकिस्तानी संघाची वागणूक बदलली असं मोहम्मय युसूफ यांना वाटतं. कर्णधारपदासाठी आपसात स्पर्धा हे सुद्धा वादामागे एक कारण असल्याचं युसूफ यांना वाटतं. संघातला प्रत्येकजण पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बनण्याचा प्रयत्न करत होता. त्या परिणामांचा अजूनही पाकिस्तान क्रिकेटला फटका बसतोय. “वनडे वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप, आशिया कप, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी संघाचं प्रदर्शन तुम्ही पाहा. कामगिरी खूप भयंकर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भरपूर सहकार्य केलं. बरेच कोच आले आणि गेले. पाकिस्तानी टीमला मदत करण्यासाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण कुठल्याही खेळाडूने जबाबदारी घेतली नाही. अखेर पीसीबीने तो निर्णय घेतला. माझं त्यांना समर्थन आहे” असं मोहम्मद युसूफ म्हणाला.
Leave a Reply