
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पार पडलेल्या कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. विशेषतः वर्णनात्मक स्वरूपाच्या पेपर तपासणीतील अनियमितता आणि गुणांमध्ये दिसून आलेल्या मोठ्या तफावतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परीक्षक, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर यांच्यामार्फत पेपर तपासणीच्या पद्धतीतील विसंगतीमुळे काही विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले, तर काहींना खूप कमी गुण मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही पेपर फक्त एका परीक्षकाने तपासले, तर काही तिघांनी तपासले, ज्यामुळे गुणांमध्ये लक्षणीय फरक पडला. आयोगानेच नेमलेल्या दळवी समितीच्या शिफारसींचे उल्लंघन झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये अनाकलनीय तफावत आढळून आल्याने त्यांच्याकडून पेपरची फेरपडताळणी आणि निकालाची पुन्हा घोषणा करण्याची मागणी करण्यात येत आहे. या गोंधळात काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, विद्यार्थ्यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) मागणी केली आहे.
Leave a Reply