
टीम इंडियाने भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. गॉल येथे पहिला कसोटी सामना १६५ धावांनी जिंकल्यानंतर, कोलंबो येथील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाच दिवसांच्या तीव्र स्पर्धेनंतर आणि प्रचंड उन्हानंतर, भारतीय ड्रेसिंग रूममधील खेळाडूंच्या शरीरावरील व्रण आणि दुखापती दर्शवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मालिकेत आपल्या फलंदाजीने छाप पाडणाऱ्या स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी जे फोटो शेअर केले त्याची आता चर्चा रंगली आहे.
या मालिकेत साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या २६ वर्षीय देवदत्त पडिक्कलने हा दौरा आपल्यासाठी ऐतिहासिक बनवला. त्याने पहिल्या कसोटीत १६७ आणि ४४ धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ११७ धावांचे शतक झळकावून मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्याच्या प्रभावी फलंदाजीसोबतच, श्रीलंकेच्या प्रखर उन्हामुळे त्याच्या पाठीवर एक अनोखा टॅन चढला.
View this post on Instagram
पडिक्कलने सोशल मीडियावर आपल्या पाठीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर त्याच्या जर्सीवरील ‘देव’ ही आद्याक्षरे आणि ३७ हा क्रमांक स्पष्टपणे दिसत आहे. चाहते या नैसर्गिक ‘जर्सी टॅटू’ला त्याचे समर्पण आणि क्रीजवर घालवलेल्या तासांचा पुरावा मानत आहेत. पडिक्कलने हे फोटो शेअर करताना लिहिले, “या संधीबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे आणि आणखी काही करण्यास उत्सुक आहे. अत्यंत चुरशीच्या मालिकेतून मी खूप काही शिकलो. आता मी पुढच्या आव्हानासाठी तयार आहे. शेवटच्या स्लाईडमध्ये, सूर्याने मला एक टॅटू दिला आहे.”
View this post on Instagram
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतलाही कोलंबो कसोटी शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक वाटली. सामन्याच्या पहिल्या दिवशी मनगटावर चेंडू लागल्याने तो ३ धावांवर दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. त्याने पुनरागमन करून ८९ चेंडूंमध्ये ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. पण दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना त्याच्या खांद्यावर अनेक चेंडू लागल्याने, त्याला तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करता आले नाही. त्यानंतर तो चौथ्या दिवशी यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात परतला.
सामन्यानंतर ऋषभ पंतने त्याच्या दुखापतींची माहिती देणारे काही फोटो शेअर केले. त्या फोटोंमध्ये त्याच्या खांद्यावर निळे डाग आणि सूज स्पष्टपणे दिसत होती. पंतने त्याच्या गंभीर दुखापतीबद्दल लिहिले, “चढ-उतार, मैदानावरची मजा, आत्मविश्वास आणि प्रत्येक धाव व विकेटसाठी पाच दिवसांची लढाई. आम्हाला २-० ने जिंकायचे होते, पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ केला. चॅम्पियन्स.”
Leave a Reply