
गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या औपचारिक कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. या दिवसावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवलं. या सामन्यात श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 366 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला आणि श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. भारताचा सलामीवीर साई सुदर्शनने या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलही नाबाद 94 धावांसह शतकाच्या जवळ पोहोचला आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 181 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमवून 247 धावा केल्या. अजूनही भारत 119 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 119 धावा करून आघाडी घेईल अशी स्थिती आहे.
दुसऱ्या दिवशी काय घडलं?
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकन संघ 5 गडी गमवून 288 धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा श्रीलंकेने अवघ्या 76 धावांवर पाच गडी गमवले. यासह श्रीलंकेचा पहिला डाव 366 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून सारांश जैन आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. तसेच यश ठाकुरच्या पदरात दोन पडले. अकीब नबी दारला एकही गडी बाद करता आला नाही. श्रीलंकेकडून कर्णधार सहान अराचिने 127 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाच्या 66 धावा असताना पहिला धक्का बसला. अमन मोखानडे 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी मोर्चा सांभाळला. सुदर्शनसोबत विक्रमी भागीदारी करणारा देवदत्त पडिक्कलही शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात 67 धावा करणारा पडिक्कल आता दुसऱ्या कसोटीतही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. साई सुदर्शनने 184 चेंडूंचा सामना करत नाबाद 104 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटीच्या कसोटीच्या पहिल्या डावातही साईने 132 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याने 81 धावांची खेळी केली होती. आता श्रीलंका दौऱ्यावर सलग दोन शतके झळकावून भारतीय संघाचा त्याच्यावरील विश्वास आणखी दृढ केला आहे.
Leave a Reply