
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी निसर्गाने मनमोहक रूप धारण केले आहे.
या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून त्याचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
उंच कड्यावरून प्रचंड वेगाने कोसळणारा शुभ्र जलप्रवाह आणि सभोवतालचा हिरवागार निसर्ग यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून आले आहे. पावसाळ्यात धपकी धबधबा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याच्या परिसरातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाणी वेगाने वाहत असल्याने आणि घसरड्या परिसरामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पर्यटकांची वर्दळ सध्या अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना धबधबे, नदीकाठ तसेच ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Leave a Reply