
दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या मराठ चित्रपटासाठी सुपरस्टार शाहरुख खान याने केलेली मदत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘देऊळ बंद 2’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी निर्मात्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. त्यावेळी शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ या कंपनीकडे असलेलं तब्बल 42 लाख रुपयांचं DCP बिल माफ करण्यात आलं. प्रवीण तरडे यांनी या मदतीमागची कहाणी सांगितली होती. विशेष म्हणजे, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवल्यानंतर निर्मात्यांनी नफा स्वतःकडे न ठेवता शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘देऊळ बंद 2’ हा तुलनेनं मर्यादित बजेटमध्ये तयार झालेला चित्रपट आहे. थिएटरमध्ये डिजिटल पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल सिनेमा पॅकेज म्हणजेच DCPसाठी निर्मात्यांना सुरुवातीला सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्ष बिल जवळपास 42 लाख रुपये आलं होतं. इतकी मोठी रक्कम उभी करणं निर्मात्यांसाठी कठीण होतं. त्यामुळे त्यांनी रेड चिलीज एंटरटेन्मेंटशी संपर्क साधून आपली आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली. मराठी चित्रपट असून बजेट मर्यादित असल्याचं त्यांनी कंपनीला सांगितलं. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही बाब अखेर शाहरुख खानपर्यंत पोहोचली. प्रवीण तरडे यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुखला चित्रपटाच्या टीमबद्दल आधीपासून माहिती होती. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या टीमने ‘देऊळ बंद 2’ तयार केला असल्याचं त्याला सांगण्यात आलं. चित्रपटाचा DCP तयार असूनही केवळ बिलाची रक्कम न भरल्यामुळे तो पुढे नेता येत नसल्याचं कळल्यानंतर शाहरुखने बिल माफ करण्याचे निर्देश दिले. ‘चित्रपट चांगला असेल तर पैसे नंतर पाहू’ या भूमिकेतून त्याने निर्मात्यांना मदत केल्याचं तरडे यांनी सांगितलं.
‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. मात्र, या यशाचा वैयक्तिक फायदा करून घेण्याऐवजी निर्मात्यांनी सामाजिक उपक्रमाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची निर्मिती किंमत वजा केल्यानंतर मिळणारा संपूर्ण नफा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येत आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील मुलांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या निधीचा उपयोग केला जात आहे.
याशिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून जवळपास 250 मुलांना दिवसातून दोन वेळचं जेवण देण्याचाही उपक्रम सुरू असल्याचं प्रवीण तरडे यांनी सांगितलं. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’चं यश केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक मदतीच्या रूपातही पुढे जात आहे.
Leave a Reply