
वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचा अन्न आणि औषध विभाग आल्यापासून त्यांनी धडक कारवायांना सुरूवात केली आहे. मे 2026 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली आणि कारवायांचा धडका सुरू झाला. पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात अन्न भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स, बनावट औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जात आहे. इतकंच काय तर अनेक बड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे परवाने रद्द केले जात आहेत. पण हा परवाना नेमका असतो तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. देशात कोणताही खाद्य व्यवसाय चालवण्यासाठी एफएसएसएआय परवाना आणि नोंदणी आवश्यक आहे. मग तो छोटा, स्टॉल असो की मोठी खाद्य कंपनी.. या परवान्याशिवाय व्यवसाय चालवणं बेकायदेशीर मानलं जातं. त्यामुळे हा परवाना रद्द झाला तर परत मिळतो का? चला या संदर्भातले नियम जाणून घेऊयात..
फूड लायसन्स कोणत्या कारणामुळे रद्द होतं?
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स एक्ट 2026 च्या कलम 32 अंतर्गत परवाना प्राधिकरणाला कोणत्याही अन्न व्यवसायाचा परवाना किंवा नोंदणी निलंबित करण्याचा अधिकार आहे. एफडीए आयुक्तांना सार्वजनिक आरोग्याचा विचार करून ही कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांच्या स्वयंपाकघराची अचानक तपासणी करतात. किचनमधील अस्वच्छता, झुरळे-उंदीर असणे, मुदत संपलेले साहित्य वापरणे, अन्न भेसळ यासारख्या गोष्टी तपासतात. जर चुका लहान असतील तर हॉटेलला आधी ‘सुधारणा नोटीस’ दिली जाते. पण स्वयंपाकघरातील परिस्थिती अत्यंत घाणेरडी असेल आणि लोकांच्या आरोग्याला धोका असेल तर या कलमांतर्गत फूड लायसन्स रद्द केलं जातं.
लायसन्स रद्द झालं तर पुढे काय?
फूड लायसन्स रद्द झाल्यानंतर व्यावसियाकाला थेट व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यासाठी एफडीए आयुक्तांकडे अपील करावी लागते. तुकाराम मुंढे यांच्यासारखे सक्षम अधिकारी दर आठवड्याला एक दिवस अशा प्रकरणांची सुनावणी घेतात. या सुनावणी दरम्यान चुका सुधारण्याची संधी असते. पण नियमांचं उल्लंघन केलं किंवा सुधारणा नोटीस देऊनही काही बदल केला नाही तर फूड लायसन्स कायमचं रद्द केलं जातं. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अन्न व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागतो.
परवाना रद्द झाल्यानंतर परत मिळू शकतो का?
एकदा का फूड लायसन्स कायमचं रद्द केलं तर परत मिळत नाही का? तर तसं अजिबात नाही. परवाना रद्द केल्यानंतर व्यवसाय चालक रद्द झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर नवीन परवान्यासाठी पुन्हा अर्ज करू शकतो. पण यासाठीही अट आहे. सुधारणा सूचनेत नमूद केलेल्या त्रूटी पूर्ण केलेल्या असाव्यात. त्रुटी सुधारल्यानंतर किचनचे नवे फोटो, पेस्ट कंट्रोलची पावती, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पाण्याची प्रयोगशाळा चाचणी गोळा करावी लागते. त्यानंतर पुन्हा तपासणीचे आदेश दिले जातात. सर्व त्रुटी दूर केल्याची खात्री पटल्यानंतर प्राधिकरण नवा परवाना जारी करते.
परवाना वेळीच नूतनीकरण केला नाही तर बसतो फटका..
काही प्रकरणात निष्काळजीपणाचाही फटका बसतो. खरं तर एफएसएसएआयकडून 1 ते 5 वर्षांचा परवाना दिला जातो. हा परवाना एक्सपायर होण्यापूर्वीच 30 दिवसांच्या आता रिन्यू करावा लागतो. जर तसं नाही तर केलं तर रद्द होतो.
Leave a Reply