
गेल्या महिन्यात, जुलैमध्ये, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण चांगले ठरले नाही. त्याने इंग्लंडमधील तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा करत 42 धावा केल्या. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान सूर्यवंशीने आपला फॉर्म परत मिळवला आणि तीन सामन्यांमध्ये 151 धावा करून मालिकावीर पुरस्कार पटकावला. वैभव सूर्यवंशीची कामगिरी पाहिल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने एक इशारा दिला आहे. अजिंक्य रहाणेंनी नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे, आता त्यांनी निवृत्तीनंतर अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे.
नुकताच निवृत्त झालेल्या रहाणेला ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टवर सूर्यवंशी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळेल का, असे विचारले असता, त्याने सांगितले की “या क्षणी काहीही सांगणे कठीण आहे.” या पॉडकास्टमध्ये डेव्हिड लॉईड, फिल टफनेल आणि इंग्लंडचे माजी कर्णधार अॅलिस्टर कूक व मायकल वॉन यांचाही समावेश होता. रहाणे पुढे म्हणाला, “मला सध्या सूर्यवंशीवर कोणताही दबाव टाकायचा नाही, कारण लोक आधीच त्याच्याबद्दल खूप बोलत आहेत. तो फक्त दोन आयपीएल हंगाम खेळला आहे. त्याला कळायला हवं की आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता, तेव्हा तुमच्यावर एका वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. आयपीएलमध्ये 4-5 षटकांत 70 धावांचा पाठलाग करणे सोपे आहे, पण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तेच काम खूप कठीण असते. त्यामुळे, त्याला कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे त्याचा खेळ खेळू दिला पाहिजे.”
सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक 776 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, त्याला आयपीएलमध्ये खेळल्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी करता आलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूंमध्ये 50 धावांची वेगवान खेळी केली, पण दुसऱ्या सामन्यात तो अवघ्या नऊ चेंडूंमध्ये 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 49 चेंडूंमध्ये 81 धावांची दमदार खेळी केली. वैभवनेही एकदा बोलून दाखवले होते की त्याचे अंतिम ध्येय हे कसोटी क्रिकेट खेळणं आहे.
Leave a Reply