
तमिळनाडूच्या राजकारणातील प्रबळ द्रविड पक्षांना पराभूत करून सत्तेत आलेले आणि अभिनेत्यापासून थेट मुख्यमंत्री बनलेले विजय आता त्यांच्या कामकाजाच्या अनोख्या पद्धतीने नवीन ओळख निर्माण करत आहेत. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवावरून प्रश्न उपस्थित केलो होते, मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले, त्यावरून त्यांनी सर्वांचीच बोलती बंद केल्याचं पहायला मिळतंय. चित्रपट असो किंवा राजकारण.. थलपती विजय यांनी त्यांच्या कामगिरीने पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
ऑफिस टायमिंग
विजय यांनी सर्वप्रथम शासकीय कामातील शिस्तीवर भर दिला. ते स्वत: दररोज सकाळी वेळेवर सचिवालयात येतात आणि संध्याकाळपर्यंत नियमितपणे काम करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी वेळेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत काम करण्याचं त्यांचं मॉडेल तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं आहे. याशिवाय त्यांनी जनतेसाठी काही मोठे निर्णयसुद्धा घेतले आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन अंमलात आणलं आहे. याशिवाय प्रवाशांना अधिक आराम मिळावा यासाठी सर्व सरकारी बसेस एकेक करून वातानुकूलित केल्या जातील, अशी घोषणा केली.
कायदा-सुव्यवस्था
विजय यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही कडक संदेश दिला आहे. यात कोणत्याही राजकीय दबावाला थारा नाही. गुन्हेगारांवर कारवाई करताना कोणत्याही राजकीय दबावाचा विचार करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सिंगापाने विशेष कृती दल’ तयार करण्यात आलं आहे. अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कृती दल स्थापन करण्यात आलं आहे.
हिंदूंच्यां मंदिरांचा निधी
थलपती विजय यांच्या सरकारने हिंदूंच्या मंदिरांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हिंदू धर्मादाय विभागाकडील 245.85 कोटी रुपयांचे 46 प्रकल्प रद्द केले आहेत. मंदिरांचा निधी हा व्यावसायिक प्रकल्पांऐवजी मंदिरे आणि भक्तांशी संबंधित उपक्रमांवरच खर्च केला पाहिजे, असं विजय यांच्या सरकारचं मत आहे. सरकारने भ्रष्टाचाराविरोधातही कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक कामांमधील कमिशन घेण्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक-खिडकी प्रणाली मजबूत करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत.
लोकप्रिय अभिनेता ते नेता
निवडणुकीतील बऱ्याच आश्वासनांची पूर्तता होणं अद्याप बाकी असलं तरी, ती टप्प्याटप्प्याने केली जातील, असा सरकारचा दावा आहे. थलपती विजय हे फक्त लोकप्रिय अभिनेते म्हणूनच नाही तर एक शिस्तप्रिय आणि निर्णायक प्रशासक म्हणूनही उदयास येत असल्याचं मत राजकीय विश्लेषक नोंदवत आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर ते तमिळनाडूच्या राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Leave a Reply