
Madhuri Pawar: ‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून विजेतेपद पटकावणारी आणि आपल्या अभिनय, नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री माधुरी पवार सध्या एका गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट करत माधुरीने गेल्या काही वर्षांपासून आपल्याला ऑनलाइन पद्धतीने त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे. या त्रासामुळे आपल्याला मानसिक तणावासोबतच सुरक्षेचीही चिंता वाटत असल्याचं तिने म्हटलं आहे. माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून कला आणि अभिनयाच्या माध्यमातून तिला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. सोशल मीडियामुळे कलाकारांना कमी वेळात मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे माधुरी पवार हे नाव प्रेक्षकांमुळेच तयार झालं असल्याचं ती म्हणाली. मात्र, सध्या याच सोशल मीडियावरून प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचता येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली.
‘गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरू आहे’
सोशल मीडिया पोस्टखाली अत्यंत घाणेरड्या कमेंट्स केल्या जात असल्याचा आरोप माधुरीने केला आहे. इतकंच नाही तर तिचं विकिपीडिया पेज हटवण्यात आल्याचं, तसंच काही फॅन पेजेस हॅक करून त्यातील काही पेजेस डिलीट करण्यात आल्याचंही तिने सांगितलं. तिच्या वर्किंग नंबरवर ‘कॉल बॉम्बिंग’ करण्यात येत असल्याने सतत फोन वाजत राहतो आणि त्याचा कामावरही परिणाम होत असल्याचं अभिनेत्रीने नमूद केलं. या सगळ्यामागे नेमकं कोण आहे आणि असं का केलं जात आहे, याची माहिती आपल्याला नसल्याचं माधुरीने स्पष्ट केलं. मात्र, या प्रकारामुळे तिला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. ‘बाहेर जाताना सुरक्षिततेची चिंता वाटते, कोण काय बोलेल किंवा काही करेल का, असे विचार सतत सुरू असतात,’ असं म्हणताना माधुरी भावूक झाली.
सायबरकडे तक्रार, आता राज ठाकरेंकडे मदतीची मागणी
माधुरीने या प्रकरणी सायबरकडे तक्रार केल्याचंही सांगितलं. मात्र, त्रास अद्याप थांबलेला नसल्याने तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची कळकळीची विनंती केली आहे. यानंतर माधुरीने मनसे चित्रपट सेनेच्या कार्यालयातून आणखी एक व्हिडीओ शेअर केला. तिने राज ठाकरे यांना पत्र दिल्याचं सांगितलं. तसेच शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांचीही भेट घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, याचा लवकरात लवकर छडा लावण्याचा विश्वास त्यांच्याकडून मिळाल्याचं माधुरीने सांगितलं.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
माधुरीची विनंती
‘मला न्याय आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या मदतीची गरज आहे. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स करून मला सतत टार्गेट केलं जात आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न होत आहेत. माझं Wikipedia पेज देखील डिलीट करण्यात आलं आहे, आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सना हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मला जाणवत आहे. एक मुलगी म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आणि भीतीदायक आहे. मी कोणाचंही नुकसान करू इच्छित नाही; मला फक्त सत्य समोर यावं, माझी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी आणि या प्रकारामागे कोण आहे याची योग्य चौकशी व्हावी, एवढीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्रा ताई पवार, आपण माझ्यासारख्या एका कलाकारा ची व्यथा समजून घेऊन मला योग्य ती मदत आणि संरक्षण मिळवून द्यावं, ही मनापासून विनंती,’ असं लिहित तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Leave a Reply