
‘हेरा फेरी’ या गाजलेल्या चित्रपट फ्रँजाइजीमधील तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंत ‘हेरा फेरी 3’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई आणि वादांमध्ये घेरलेला आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं, परंतु तेव्हा परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. वादानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटाबद्दल विचार केला आणि बाबूरावची भूमिका साकारण्यासाठी तयार झाले. राजू, श्याम आणि बाबूराव म्हणजेच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. मात्र आता पुन्हा एकदा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटातून माघार घेतली आहे. या चित्रपटातून ते बाहेर पडल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर माघार घेतल्यानंतर त्यांनी तगड्या फी सह व्याजाची रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हेरा फेरी 3’ची शूटिंग सुरू होण्याआधीच परेश रावल यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. यामागचं कारण फी असल्याचं म्हटलं जात आहे. परेश रावल यांना या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन मिळणार होतं. तर साइनिंग अमाऊंट म्हणून त्यांनी जवळपास 11 लाख रुपये स्वीकारले होते. उरलेली 14.89 कोटींची रक्कम यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याने मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी या प्रोजेक्टला सोडलं आहे.
परेश रावल यांनी निर्मात्यांना त्यांची साइनिंग अमाऊंट 15 टक्के व्याज आणि नुकसान भरपाईसह परत केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याने त्यांचे 14.89 कोटी रुपयांचं मानधन दिलं जाईल, या अटीवर परेश रावल नाराज होते. चित्रपटाचं शूटिंग 2026 च्या अखेरीस सुरू होऊन 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने, त्यांना त्यांचं मानधन मिळवण्यासाठी जवळपास दोन वर्षे वाट पाहावं लागलं असतं. इतका काळ ते प्रतीक्षा करण्यास तयार नव्हते. या वृत्तावर अद्याप परेश रावल किंवा निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
Leave a Reply