
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये खड्ड्यामध्ये पडून टीडीआरएफ जवान विकास लहू गोरे याचा मृत्यू झाला आबल्याची माहिती समोर आली आहे. शहापूरवरून ठाण्याकडे दुचाकीवरुन कामावर जात असताना खड्ड्यात गाडी गेल्याने दोन्ही टायर फुटल्याने अपघात होऊन विकास यांचा जीव गेला. या घटनेनंतर आज TDRF च्या टीमने विकास यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी विकास यांचे सहकारी भावुक झाल्याचे पहायला मिळाले.
विकासच्या सहकाऱ्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
आज टीडीआरएफच्या 28 जणांच्या पथकाने विकास गोरे यांच्या घरी जात कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी विकासच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. 2019 पासून ठाणे अग्निशामक दल आणि टीडीआरएफसोबत कार्यरत असलेला विकास कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी जवान म्हणून ओळखला जात होता. कुठलाही आपत्कालीन कॉल आला की विकास सर्वात आधी पुढे असायचा,अशी भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
विकासला वेळेत मदत मिळाली नाही
भिवंडी इमारत दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता ढिगाऱ्याखालून 10 मृतदेह बाहेर काढण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. पाण्यातील बचावकार्यात तो तज्ज्ञ मानला जात होता. नदी, तलाव किंवा पाण्यातील कोणत्याही कॉलसाठी तो नेहमी सज्ज असायचा. आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवतो, पण आमचाच जवान रस्त्यावर मदतीसाठी हाका मारत राहिला, अशी खंत सहकाऱ्यांनी व्यक्त केली. अपघातानंतर बराच वेळ तो ‘वाचवा, वाचवा’ अशी हाक देत होता, मात्र वेळेत मदत न मिळाल्याची वेदना सहकाऱ्यांनी मांडली. विकास आमच्यातून गेला असला तरी आम्ही 28 भाऊ त्याच्या कुटुंबामागे कायम खंबीरपणे उभे राहू, असा शब्द टीमने दिला.
प्रशासनाने रस्त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे
पुढे बोलताना सहकाऱ्यांनी सांगितले की, ‘कॅरमपासून विविध उपक्रमांपर्यंत विकास सर्वांचा लाडका आणि टीममधील सर्वाधिक सक्रिय सदस्य होता. जास्तीत जास्त लोकांची मदत करायची, कोणालाही दुखापत होऊ नये हेच विकासचे स्वप्न आणि कार्यपद्धती होती. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी टीडीआरएफ जवानांनी केली.
Leave a Reply