
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर ८० रुपयांवर पोहोचला आहे. या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम करत आहेत. साठेबाजी रोखून दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साखर व्यापाऱ्यांवर साठा मर्यादेचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार, व्यापारी एका वेळेला एका ठिकाणी ४०० टनांपेक्षा अधिक साखर ठेवू शकणार नाहीत आणि साखर मिळाल्यापासून १५ दिवसांपेक्षा अधिक काळ साठा करता येणार नाही. साखरेची साठेबाजी थांबल्यास दर कमी होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशात पुढील तीन महिने पुरेल एवढी ८० लाख टन साखर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातही १८ लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे सट्टेबाजी थांबवून कठोर कारवाई केल्यास दर नियंत्रणात येतील, असे मत अनेक नेत्यांनी मांडले आहे. साखर गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे, ज्यामुळे पुरवठा वाढून दर स्थिर होण्यास मदत होईल.
Leave a Reply