
केवळ जास्त कमाई केल्याने कोणी श्रीमंत होत नाही. तुम्ही कमाईतून किती बचत करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठे गुंतवणूक करता आणि खर्च कसा सांभाळता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकांना गलेलठ्ठ पगार असूनही महिन्याच्या शेवटी पैशाची कमतरता जाणवते. तर काही सामान्य लोक थोडी थोडी बचत करून संपत्ती निर्माण करतात. खरं तर तुम्ही ज्या गोष्टी करतात, त्यापेक्षा उलट्या गोष्टी श्रीमंत लोक करतात. त्यामुळेच ते श्रीमंत होतात. सामान्य माणूस मात्र नेहमीच्या पद्धतीनेच कमाई करत असतो. श्रीमंत लोक असं नेमकं काय करतात?
1. आधी बचत करा, मग खर्च करा
श्रीमंत लोकांचा एक कानमंत्र आहे. तो ते प्रत्यक्षात उतरवतात. ते आधी बचत करतात आणि मग खर्च करतात. सामान्य माणूस नेहमी आधी खर्च करतो आणि मग बचत करतो. पण श्रीमंत लोक त्याच्या उलटं काम करत असतात. पगार येताच श्रीमंत लोक आधी बचतीचे पैसे किंवा गुंतवणुकीचे पैसे बाजूला काढतात. उदाहरण देऊन सांगायचं तर, श्रीमंत व्यक्तीचा पगार 1 लाख रुपये असेल तर तो त्यातील 20-30 हजार रुपये आधी बचत किंवा गुंतवणूक म्हणून बाजूला काढतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून घरातील उर्वरित गोष्टी मार्गी लावतात.
2. नियमित गुंतवणूक करा, घाई नको
पैसा वाढवायचा असेल तर एखाद्या गुंतवणुकीतून मोठी रिटर्न आली पाहिजे, असं काही नाही. त्याऐवजी गरजेनुसार आणि टार्गेटच्या हिशोबानुसार सातत्याने गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्यासाठी ईपीएफ, पीपीएफ, म्यूच्युअल फंड, एनपीएस वा बॉन्ड सारख्या ऑप्शनचा विचार केला पाहिजे. बाजारात घसरण झाल्यावर घाबरू नका. गुंतवणूक करणं थांबवू नका. त्याऐवजी दीर्घकाळासाठी गुंतवणूक राहू द्या. एखाद्या ठिकाणी जास्त पैसा मिळाला म्हणून तिथे पैसा गुंतवू नका. तुमच्या रिस्कवर निर्णय घ्या.
3. कमाई वाढल्यावर खर्च वाढवू नका
पगार वाढल्यानंतर त्याच वेगाने खर्च वाढत असेल तर वाढलेल्या कमाईचा काडीचा उपयोग नाही. याला लाइफस्टाईल वाढणं म्हटलं जातं. समजा एखाद्याची कमाई 50 हजारावरून 80 हजार झाली तर त्या अतिरिक्त रकमेतून महागडे शौक करू नका. खरेदीवर अतिरिक्त पैसा खर्च करू नका. या पैशातील काही भागाची बचत करा. त्याची गुंतवणूक करा. सांगायचंच झालं तर, 30 हजार रुपये अतिरिक्त वाढले असतील तर त्यातील 10 हजार रुपये लाइफस्टाईलवर खर्च करा आणि उरलेल्या 20 हजाराची गुंतवणूक करा.
4. विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे, संरक्षण
उत्पन्न आणि गुंतवणुकीबरोबर आपले पैसे रिस्क पासून वाचवणंही महत्त्वाचं आहे. आरोग्य विम्यामुळे मोठ्या आजारपणात मोठा दिलासा मिळतो. तुमचं कुटुंब तुमच्या कमाईवरच अवलंबून असेल तर जीवन विमा तुम्हाला आर्थिक संरक्षण देतो. किती कव्हर करण्याची गरज आहे हे कुटुंबाचा खर्च, कर्ज आणि भविष्यातील जबाबदाऱ्या पाहून ठरवलं पाहिजे. विम्यातून पैसा कमावता येत नाही. किंवा तो डबल होत नाही. केवळ संकटाच्या काळात आर्थिक संरक्षण करणं हे विम्याचं काम आहे.
5. वर्षातून एकदा पैसा चेक करा
केवळ गुंतवणूक करणं पुरेसं नाहीये. तर काळाबरोबर तुमची कमाई, खर्च, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि फायनान्शिअल गोल्स बदलू शकतात. त्यामुळे वर्षातून कमीत कमी एक वेळा पूर्ण पैशाचा रिव्ह्यू करा. त्यात खर्च, गुंतवणूक, कर्ज, विमा, एमर्जन्सी फंड, टॅक्स आणि निवृत्तीचा प्लान पाहा. तुमच्या जुन्या गुंतवणुकी तुमच्या लक्ष्याप्रमाणे आहेत की नाही हे सुद्धा पाहा. वेळेत रिव्ह्यू केल्याने वायफळ खर्च करण्याची गरज पडत नाही.
Leave a Reply