
Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची चर्चा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशभरातील तरुणाईशी संवाद साधत आहेत. पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात फक्त हजारो तरुणींना सहभाग नोंदवला होता. राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली. त्यांनी या कार्यक्रमात देशात महिलांची स्थिती गंभीर आहे, असा आरोप केला. महिलांना करिअरची संधी दिली जात नाही. महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, असा आरोप केला. आता त्यांच्या याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राहुल गांधींवर पलटवार केला.
पुण्यात आज भाजपाने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम घेतला. पण त्यांचा हा कार्यक्रम छात्रों की गूंज नव्हे तर झूट की गूंज आहे. राहुल गांधी मुलींना सांगतात की तुमच्या परिवाराच्या विरोधात बंड करा, भारत देश पितृसत्ताक आहे, या देशात महिलांना जागा नाही, असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.
तसेच, आज अनेकजण तरुणांना जेन झी, अल्फा जनरेशन, बिटा जनरेशन म्हणतात. पण मी या तरुणांना युवाशक्ती मानतो. ही युवा शक्ती फार हुशार आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकात छात्रों की गूंज या कार्यक्रमात भाषण केलं. त्यांच्या याच कार्यक्रमात एक युवा मुलगी होती. तिने फॅक्ट चेक केलं. राहुल गांधी यांनी मांडलेल्या 40 मुद्द्यांपैकी 29 मुद्दे कसे खोटे आहेत हे शोधून काढले. तिने झूट की गूंज नावाची एक वेबसाईट सुरू केली. त्या वेबसाईटवर राहुल गांधी कसे खोटं बोलत आहेत, ते सगळं सांगितलं. म्हणूनच तेथील कर्नाटक सरकारने त्या मुलीवर गुन्हा दाखल केला, असा आरोपही त्यांनी केला.
या देशात मातृसत्तेचं सर्वात मोठं प्रतिक हे वंदे मातरम् आहे. वंदे मातरम् सुरू झाल्यावर सोनिया गांधी यांनी थयथयाट सुरू केला. अनेक स्वातंत्र्यसैनिक फासावर चढले. पण ते वंदेमातरम् गीत गात राहिले. काँग्रेस पक्षाला एकच प्रश्न आहे की महिलांना संधी देण्याची वेळ होती तेव्हा त्यांनी प्रियंका गांधी यांना संधी का दिली नाही. काँग्रेसला हिमाचलच्या, कर्नाटक मंत्रिमंडळात घेण्यासाठी एकही महिला मिळत नाही. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
Leave a Reply