
मकरंद निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मकरंद निंबाळकर हे ठाकरे गटातील माजी सहसंपर्कप्रमुख तसेच ओमराजेंचे लांबचे सोयरीक आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांचे खासदार पक्ष सोडून निघून गेले होते. आता ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांना फोडल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. हे कृत्य अत्यंत वाईट असून, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे मकरंद निंबाळकर यांनी नमूद केले. निवडून आलेले सदस्य हे मशाल चिन्हावर निवडून आले होते. जर ताकद होती, तर ओमराजे यांनी या सदस्यांना राजीनामा देऊन धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवून जिंकून आणायला हवे होते, असे आव्हानही मकरंद निंबाळकर यांनी दिले. यासोबतच, गेल्या आठवड्यात भाजपने कळंबमधील नऊ नगरसेवक फोडल्याचा आरोपही मकरंद निंबाळकर यांनी केला.
या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असून, यामागे राणा पाटील आणि भाजप असल्याचे त्यांनी म्हटले. भविष्यात शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील, असा इशाराही मकरंद निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांना दिला आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
Leave a Reply