
शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अंबरनाथमध्येही सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने लहान मुलांना वडापाव, समोसा आणि भजी यांसारखे पदार्थ विकणे बंद केले आहे. याबाबत दुकानाबाहेर फलकही लावण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये शाळकरी मुलांना वडापाव विकण्यास बंदी
समोर आलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना जंक फुडची विक्री करू नये, असा आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्यानंतर अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने लहान मुलांना वडा, समोसा, भजी देणं बंद केलंय. याबाबतचा फलकच दुकानाबाहेर लावण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळकरी मुलांना वडापाव मिळणार नाही. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे
बबन वडापाव हा अंबरनाथ शहरातला प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावची एक शाखा अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेबाहेर आहे. याठिकाणी इतर ग्राहकांना 15 रुपये, तर शालेय विद्यार्थ्यांना 10 रुपयात वडापाव दिला जायचा. मात्र तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर याठिकाणी लहान मुलांना कोणतेही खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळं आर्थिक नुकसान होत असलं, तरी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शासनाचा निर्णय हे नफा-तोट्यापेक्षा महत्त्वाचं असल्याचं बबन वडापावचे मालक अमर पटेल यांनी सांगितलं आहे.
वडापाव खाल्ल्याने शाळकरी मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
वारंवार वडापावसारखे जास्त कॅलरी आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वडापाव पोट भरतो, पण तो फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि इतर पोषक पदार्थांचा पर्याय नाही. मुलांच्या वाढीसाठी विविध आणि संतुलित आहार आवश्यक असतो. त्यामुळे वडापाव खाल्ल्यास पोषणाचा समतोल बिघडू शकतो.
वडापावसोबत चटणी, सॉस इत्यादी घेतल्यास एकूण सोडियमचे सेवन वाढू शकते. जास्त सोडियमचे सेवन केल्यास बीपीसी समस्या उद्भवू शकते. तसेच वडापाव तयार करताना स्वच्छता न राखल्यास आणि खराब तेल किंवा दूषित पाणी/कच्चा माल वापरल्यास अन्नातून होणारे आजार होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांनी वडापाव खाणे टाळणे गरजेचे आहे.
Leave a Reply