
गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या बिग बॉसच्या शोदरम्यान सुरू झालेली मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे एकत्र असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावरही दोघे अनेकदा रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले आहेत.
मात्र, काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलने सोशल मीडियावर हार्टब्रेकशी संबंधित पोस्ट शेअर केली होती. एवढंच नाही तर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर दोघांनीही थेट भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे चाहत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता.
निक्की आणि अरबाजचं ब्रेकअप नाहीच
आता मात्र या संपूर्ण प्रकरणामागचं कारण समोर आलं आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोघे ‘किसी और की गली’ या गाण्यात एकत्र दिसले आहेत. हे गाणं ब्रेकअपच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, त्याची कथा प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील फसवणुकीभोवती फिरते. त्यामुळे गाण्याच्या प्रमोशनसाठी दोघांनी ब्रेकअपचा आभास निर्माण केला असल्याचं समोर आलं आहे.
निक्की आणि अरबाजचं प्रत्यक्षात ब्रेकअप झालेलं नसून दोघे अजूनही एकत्र असल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी केवळ गाण्याच्या प्रमोशनसाठी ब्रेकअपचं नाटक केल्याबद्दल दोघांना ट्रोलही केलं आहे. दुसरीकडे, त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींनी म्युझिक व्हिडीओचं कौतुक केलं आहे.
अरबाजने निक्कीला केलं प्रपोज
दरम्यान, निक्की-अरबाज यांची जोडी यापूर्वी ‘The 50’ या शोमध्येही एकत्र दिसली होती. या शोदरम्यान अरबाजने गुडघ्यावर बसून निक्कीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, त्यांच्या आंतरधर्मीय नात्याला निक्कीच्या वडिलांची संमती नसल्याचं अभिनेत्रीने यापूर्वी सांगितलं होतं.
त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चेनंतर आता निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, ‘किसी और की गली’ या गाण्यामुळे त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Leave a Reply