
BJP-Shivsena on Vidhan Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच सुरूच असल्याचे समजते. प्राथमिक चर्चेत काही जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाल्याचे समजते. तर आज शनिवारी सकाळीच विधानपरिषद जागा वाटपासाठी भाजप व शिवसेनेमध्ये खलबते सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नंदनवन या शासकीय निवासस्थानी विधानपरिषद निवडणुकीच्या जागांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
तीनही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी, नंदनवन येथे पोहचले. विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. एकूण १७ जागांपैकी शिवसेनेने ६ ते ७ जागांवर दावा सांगितला आहे. सध्या भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर प्राथमिक चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. पण शिवसेनेने अधिक जागांची मागणी केल्याची समजते. तीन जागांवर शिवसेना तयार नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केल्याने अधिक जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. अनेक जण इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणाला मोठा धक्का न लावता भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार का? असा मोठा सवाल आहे. तर सेनेला अधिकची जागा दिल्यास राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अधिक जागेसाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. भाजपसमोर मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे.
महायुतीत जागांची अदलाबदल?
ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपचा मोठा पेच आहे. शिवसेना दोन्ही ठिकाणी दावा सांगत आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केला आहे. याठिकाणी भाजपचे संख्याबळ अधिक आहे. अशावेळी पारंपारिक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आवाहन महायुती समोर असेल. तीनही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण याच आठवड्यात जागा वाटप करण्याचे महायुतीने ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply