
आयुष्यभर मुलांसाठी झटणाऱ्या आई-वडिलांना शेवटच्या क्षणी मुलांची साथ मिळावी, एवढीच अपेक्षा असते. मात्र, हरियाणातील सोनीपत येथील एका घटनेने बदलत्या कौटुंबिक नात्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनीपत येथून नात्यांमधील बदलती परिस्थिती दाखवणारी एक अत्यंत भावूक घटना समोर आली आहे. एकेकाळी कापडाचे मोठे व्यापारी असलेले शिवचरण रामरतन गुप्ता यांनी आपल्या तीनही मुलींना शिकवलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, अखेरच्या काळात त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. तिथेच त्यांची अखेर झाली, मात्र तेव्हा किंवा मृत्यूनंतरही त्यांच्या मुली काही आल्या नाहीत.
व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर गुप्ता यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अखेर त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला. ज्या तीन मुलींशी ते दिवसातून दोन-तीन वेळा व्हिडिओ कॉलवर बोलायचे, वडिलांच्या निधनानंतर त्याच मुली अंतिम दर्शनासाठी प्रत्यक्षात मात्र पोहोचू शकल्या नाहीत. अखेर आश्रम व्यवस्थापनानेच गुप्ता यांचेअंत्यसंस्कार केले आणि मुलींनी व्हिडिओ कॉलवरूनच त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यासाठी मुलींनी पैसेही पाठवले होते , मात्र नंतर आश्रमाने मोठा निर्णय घेत ते पैसे परत पाठवले.
पत्नीचाही आश्रमातच झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण मूळचे महाराष्ट्रातील होते. सोनीपतच्या ककरोई गावात त्यांचे काही नातेवाईक राहत होते. 2024 मध्ये ते सोनीपत येथील ‘आपना घर’ आश्रमात दाखल झाले. कापडाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी आश्रम व्यवस्थापनाला सांगितले होते.
काही दिवसांनी ते पत्नी मीना गुप्ता यांनाही आश्रमात घेऊन आले. दोघेही पती-पत्नी तेथे एकत्र राहू लागले. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मीना गुप्ता यांचे आश्रमातच निधन झाले. आश्रमाने त्यांच्या तीनही मुलींना आईच्या निधनाची माहिती दिली. मात्र, त्यावेळी आईच्या अंत्यसंस्कारासाठी एकही मुलगी आली नाही. यानंतर शिवचरण यांनी आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पत्नीवर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर नंतर हरिद्वारला जाऊन त्यांनी पत्नीच्या अस्थींचे विसर्जनही केले.
मुलींवर जीवापाड प्रेम करणारे वडील
आश्रमाच्या संचालिका सारिका कालरा यांच्या सांगण्यानुसार, शिवचरण आपल्या तीनही मुलींवर खूप प्रेम करत होते. एक मुलगी नेपाळमध्ये, एक सूरतमध्ये तर एक उत्तर प्रदेशात राहत होती. दोन मुली शिक्षिका होत्या, तर एक एचडीएफसी बँकेत नोकरी करत होती.
शिवचरण दिवसातून दोन-तीन वेळा मुलींशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची त्यांना सतत काळजी असायची. कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतरही त्यांची स्वप्नं मात्र संपली नव्हती. त्यांना पुन्हा एकदा कापडाचे दुकान सुरू करायच होतं. , थोडी मदत मिळाली तर ते पुन्हा छोटासा व्यवसाय उभा करतील, असं ते आश्रमात ते अनेकदा सांगायचे.
एक मुलगी वडिलांना भेटायलाही आली होती
आश्रमातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी मुलगी नीता अग्रवाल यांचा गुप्ता यांच्याशी वेळोवेळी संपर्क होता. वडिलांना औषधे, कपडे किंवा इतर काही गरज असल्यास त्या मदत करत असत. गेल्या वर्षी, 2025 साली त्या आश्रमातही आल्या होत्या आणि काही काळ वडिलांसोबत राहिल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा परत गेल्या.
शिवचरण यांनी 12 मार्च 2026 रोजी आश्रम सोडला. दिल्लीमध्ये काही पैसे घेणे आणि काही मालमत्तेचे व्यवहार पूर्ण करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सोनीपतला परत येऊन पुन्हा छोटासा कापडाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, नंतर ते दुसऱ्या एका आश्रमात राहत असल्याची माहिती आश्रम व्यवस्थापनाला मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण बोलणे होऊ शकले नाही.
वडील आजारी असल्याची माहिती 20 दिवस आधीच दिली होती
दरम्यान, शिवचरण यांची प्रकृती खालावू लागली. आश्रम व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 20 दिवस आधीच तीनही मुलींना देण्यात त्यांच्या आजाराची माहिती आली होती. निधनाच्या चार दिवस आधीही मुलींना वडील आजारी असून त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितलं होतं. मात्र, तरीही एकही मुलगी वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली नाही. अखेर मंगळवारी रात्री उशिरा शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाले. निधनाची माहिती मिळाल्यानंतर आश्रमाने पुन्हा एकदा मुलींशी संपर्क साधला आणि अंत्यसंस्कारासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र, अंतर आणि वेळेचे कारण देत त्यांनी येणे शक्य नसल्याचे सांगितले.
5100 रुपये पाठवले, पण अंत्यसंस्कारासाठी आल्या नाहीत
नेपाळमध्ये शिक्षिका असलेल्या मोठ्या मुली अनीता यांनी ऑनलाइन 5100 रुपये पाठवले. वडिलांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची विनंती त्यांनी केली. तीनही मुलींनी व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराचा व्हिडिओही मागितला. अस्थी विसर्जनाबाबतही त्यांनी आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली. दूर असल्यामुळे अस्थी विसर्जनाची जबाबदारीही आश्रमानेच घ्यावी, अशी विनंती मुलींनी केली. मात्र, आश्रम व्यवस्थापनाने मुलींनी पाठवलेले 5,100 रुपये परत केले
आयुष्यात पहिल्यांदाच अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलवर दाखवावे लागले
एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवण्याची वेळ त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली, असं आश्रमाशी संबंधित एका समाजसेवकाने सांगितलं. ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटलं. या प्रकरणावर अद्याप मुलींच्या बाजूने कोणतीही सविस्तर सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Leave a Reply