
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्याचे मंत्री अशोक उईके यांच्यासमोर तीव्र आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील असुविधांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आंदोलकांची भेट घेण्यासाठी घटनास्थळी आले होते. त्यांनी आंदोलकांशी सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान मंत्र्यांनी दिलेली आश्वासने लेखी स्वरूपात देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र, ती पूर्ण न झाल्याने चर्चा फिस्कटली. यानंतर विद्यार्थी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट लाऊडस्पीकरवरून मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीमुळे अखेर मंत्री उईके व्यासपीठावरून खाली उतरले आणि गाडीत बसून निघून गेले. मंत्री निघून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. या घटनेनंतर, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी यवतमाळमधील मंत्री उईके यांच्या निवासस्थानाकडे कूच केले. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे, तर भाजपने काँग्रेसवर आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करून राहुल गांधींचे राजकीय भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
Leave a Reply