
नाशिकमध्ये कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शेती क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. “नाशकातील शेती क्षेत्रात झालेली क्रांती विलक्षण आहे,” असे ते म्हणाले. फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी ८०% निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. तसेच, नाशिकचा कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
या जिल्ह्यात अतिशय मेहनती शेतकरी असून, आदिवासी भागातही वनोपजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, असे त्यांनी सांगितले. आज शेतीत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसंख्या वाढल्याने आणि जमिनीचे विभाजन झाल्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यांना गुंतवणुकीत अडचणी येतात. उत्पादन खर्च वाढत असताना, शेतमालाच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रभाव असतो. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शेतीमध्ये संशोधन आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे कृषी महाविद्यालय आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
Leave a Reply