
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात हे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जरांगे पाटील यांची तब्येत खालावण्यास सुरूवात झाली आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले होते. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची प्रमाणपत्रे तातडीने वाटण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही याबाबतच्या कार्यवाहीला सुरूवात झालेली नाही. यानंतर आत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आजपासून जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरु आहे. आम्ही सांगितलं सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा. यांना आंदोलन मोडून काढायचं आहे. दंगली घडवायच्या आहेत का? काम कमी करायचं आणि दुसऱ्या जातींना डाग लावायचा. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे असं सुरू आहे. सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. रद्द केलेले 4 प्रमाणपत्र वैध करून पाहिजे. 58 लाख नोंदीचे आजपासून जात प्रमाणपत्र वाटप सुरु करा. सातारा, कोल्हापूर संस्थांचे जीआर काढा. हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करा. ECBC मधून निवड झालेल्या झालेल्या मुलांना नियुक्त्या द्या.’
यांच्या डोक्यात दंगल घडवायची असेल तर…
सरकारने दिलेला मसुदा मान्य आहे का? यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, मी वाचला नाही. तुम्ही माणसाची तब्येत खराब होण्याची वाट पहा. तुम्ही माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि वाचला का विचारणार. नीच अवलादी आहेत. मराठे चवताळले तर तुम्हाला हाता खालून काढतील. मुंबईतही हेच होईल. हे वारंवार मला विचारतात, बहुतेक यांच्या डोक्यात वेगळंच काहूर आहे. यांनी आमचा एक माणूस मारला की आम्ही यांचा एक माणूस मारणार, यांचं मोठं षड्यंत्र आहे. तिथे बसून भजे कुरडाया खातात. तुम्ही किती नीच आहात रे. आमच्या जातीचे असूनही तुम्ही नीच आहात. आपण कुणालाही हात लावायचा नाही. यांना फक्त हात लावू द्या. यांच्या डोक्यात दंगल घडवायची असेल तर मी उपोषण सोडून देईन आणि टप्पू गोटे घेऊन व्यासपीठावर बसेल.
Leave a Reply