
गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह हे सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत, सुरुवातीला त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी लिपूलेखवर देखील दावा सांगितला होता. तसेच या संदर्भात मध्यस्थी करावी असं पत्र देखील त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहानांवर देखील टोला लावण्याचा निर्णय घेतला, तसेच या वाहनांना अस्थाई वाहने म्हणून नोंदणी करणं बंधकारक केलं होतं. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे. दरम्यान त्यानंतर भारताकडून साखरेच्या रुपात नेपाळला पहिला दणका देण्यात आला, पुढील तीन वर्ष आता भारत नेपाळला कोणत्याही प्रकारे साखर निर्यात करणार नाहीये, त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळसाठी भारताने दिलेला हा झटका ताजा असतानाच आता भारताने बालेन शाह यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
भारतासोबत नेपाळचा वाद वाढतच चालला आहे, याचदरम्यान आता नेपाळने पुन्हा एकदा आपले चहा निर्मितीचे चार कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतासोबत सुरू असलेल्या या वादाचा नेपाळला मोठा फटका बसला असून, नेपाळचा चहा उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. नेपाळने चहाचे कारखाने तर सुरू केले आहेत, मात्र आता भारताच्या कडक नियमांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या एफएसएसएआयने चहासाठी जोखीम-आधारित तपासणी प्रणाली लागू केली आहे, या नियमानुसार भारत जो चहा आयात करणार आहे, त्यातील वीस टक्के चहाचे नमुने रँडम पद्धतीने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत, हा नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
भारताच्या या नव्या नियमाचा नेपाळच्या चहा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काठमांडू पोस्टच्या एका रिपोर्टनुसार भारताच्या नव्या नियमामुळे नेपाळमध्ये तयार होणारी चहा पावडर ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याने जवळपास 3 लाख किलो चहापावडर ही बॉर्डवर अडकून पडली आहे, तर सध्या स्थितीमध्ये नेपाळमध्ये दहा लाख किलो चहापावडर बनून तयार आहे, मात्र भारतातील आयात ठप्प झाल्याने आता या सर्व कारखानदारांनी पुन्हा एकदा आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Leave a Reply