
IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात जोरदार राडा झाला. पहिल्याच दिवशी मैदानावर झालेल्या तीव्र वादानंतर आयसीसीने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. आयसीसीने या वादावर थेट कारवाई केली आहे. भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो हे दोघेही आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. दोन्ही खेळाडूंवर आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१२ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. ते खेळाडू किंवा सामना अधिकाऱ्याशी अयोग्य शारीरिक संपर्क साधल्याबद्दल दोषी आढळले आहेत.
आयसीसीने या उल्लंघनांवर कठोर भूमिका घेतली असून यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो या दोघांनाही त्यांच्या सामना शुल्काच्या २५% दंड ठोठावला आहे. त्यांच्या शिस्तभंगाच्या नोंदींमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ महिन्यांत या दोन्ही खेळाडूंसाठी हा पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनासारखी कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही.
ही घटना भारतीय डावाच्या १७ व्या षटकात घडली, जेव्हा असिथा फर्नांडोने यशस्वी जयस्वालला बाद केले. बाद झाल्यानंतर, जयस्वाल गोलंदाजाच्या दिशेने गेला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर फर्नांडोने जयस्वालच्या दिशेने आपले डोके पुढे केले आणि प्रत्युत्तर म्हणून जयस्वाल पुढे झुकला, ज्यामुळे समोरासमोर धडक झाली. पंच आणि इतर खेळाडूंनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.
सामन्यानंतर, दोन्ही खेळाडूंनी अमिरात आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली आणि आपली चूक मान्य केली. खेळाडूंनी आपला गुन्हा मान्य केल्यामुळे, कोणत्याही औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. आता भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. दोन्ही सामन्यात भारतीय संघाकडून देवदत्त पडिकल याने धुमाकुळ घातला. दोन्ही सामन्यात त्याने शतकी खेळी खेळली.
Leave a Reply