
पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या मतदानानंतर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना अमित शाह यांनी भाजप पहिल्या टप्प्यात 152 पैकी 110 जिंकत आहे, असा दावा केला. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांचं सरकार जाणार असून भाजप सरकार येणार आहे असा मोठा दावा शाह यांनी केला. पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. “बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात परिवर्तनासाठी रेकॉर्ड तोड मतदान झालं आहे” असं अमित शाह म्हणाले. “मतदानाची ही टक्केवारी उत्साह वाढवणारी आहे. बंगालमध्ये एका दीर्घ कालावधीनंतर एकही मृत्यू झालेला नाही. यासठी मी बंगाल पोलीस आणि निवडणूक आयोगाचे आभार मानतो” असं अमित शाह म्हणाले.
पहिल्या टप्प्यात बंगालच्या जनतेने विकासाला निवडलं आहे असं गृहमंत्री म्हणाले. “काल आम्ही सर्व आढावा घेतला. आम्ही 152 पैकी 110 जागा जिंकणार आहोत. दुसऱ्या टप्प्यानंतर आम्ही प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकणार आहोत” असा अमित शाह यांचा दावा आहे. “काल 30 पेक्षा कमी लोक जखमी झाले. हे निवडणूक शांततेत पार पडल्याचे संकेत आहेत. कालच्या निवडणुकीत जे मतदान झालय. ती परिवर्तनाची निवडणूक आहे” असं अमित शाह यांनी सांगितलं.
भाजपची पश्चिम बंगालमध्ये उद्दिष्ट्य काय?
“लोक म्हणायचे जनसमर्थन आहे, पण मतदान होणार का? काल ते सुद्धा दिसलं. मी दीदींना सांगू इच्छितो की, बंगालचा पुढचा मुख्यमंत्री बंगालमध्येच जन्मलेला असेल. तुमचा भाचा नसेल. बंगालमध्ये आम्ही महिलांना सुरक्षा देऊ” असं अमित शाह म्हणाले. “भाजप सरकार बनल्यानंतर कुठलाही भाचा टॅक्स घेतला जाणार नाही. आम्ही हे संपवणार. शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी मोठे रिजर्व सेंटर बनवणार. 10 कोटीपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार बंगालमध्ये झाला आहे. याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करु” असं शाह म्हणाले.
आम्ही परिवर्तनाचं आवाहन केलय असं अमित शाह म्हणाले. “घुसखोरी मुक्त बंगाल, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती, कायद्याचं राज्य आणि केडर राजमधून बंगालला मुक्त करणं ही आमची उद्दिष्टय आहेत” असं अमित शाह म्हणाले.
Leave a Reply