
वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत भावपूर्ण आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. हा सण केवळ धार्मिक विधी नसून, वैवाहिक जीवनातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकमेकांवरील समर्पण यांचे सुंदर प्रतीक आहे. 29 जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी किती वाजता वडाची पूजा करावी? कोणत्या वेळेत पूजा करणे टाळावे? हे जाणून घ्या…
वटपौर्णिमेचे महत्त्व आणि पार्श्वभूमी
वटपौर्णिमेच्या मागे सावित्री-सत्यवानाची प्रसिद्ध कथा आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि अटल निश्चयाने यमराजांकडून आपल्या पती सत्यवानांचे प्राण परत मिळवले. या कथेच्या माध्यमातून पती-पत्नीतील अटूट बंधन, प्रेम आणि त्यागाचे महत्त्व सांगितले जाते. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थिरता आणि अखंड समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच विवाहित स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून पवित्र धागा बांधतात आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करतात.
वटपौर्णिमा २०२६ तिथी
वैदिक पंचांगानुसार, वटपौर्णिमा २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाईल.
पौर्णिमा तिथी सुरुवात: २९ जून २०२६, पहाटे ३:०७ वाजता
पौर्णिमा तिथी समाप्ती: ३० जून २०२६, पहाटे ५:२७ वाजता
पूजेसाठी शुभ मुहूर्त
२९ जून २०२६ रोजी सकाळी ६:३० ते दुपारी १२:३० या वेळेत पूजेसाठी उत्तम मुहूर्त आहे. या सहा तासांच्या कालावधीत पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
पूजा टाळावी अशी वेळ
धार्मिक मान्यतेनुसार, २९ जून रोजी दुपारी १२:३० ते २:३० या दोन तासांच्या काळात वटपूजा करणे अशुभ समजले जाते. या वेळेत पूजाविधी टाळण्याची पारंपरिक सूचना आहे.
पूजेसाठी आवश्यक साहित्य
-हळद, कुंकू, अक्षता, फुले
-तेल किंवा तुपाचा दिवा
-वडाच्या झाडाला बांधण्यासाठी पांढरा सुती धागा किंवा रक्षासूत्र
-बांगड्या, मंगळसूत्र व इतर सौभाग्यालंकार
-विड्याची पाने, पाण्याने भरलेला तांब्याचा कलश
-आंबे व इतर पाच प्रकारची फळे
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply