
Uddhav Thackeray on Gen Z -Dharmendra Pradhan: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात इतिहास घडवला. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याची पहिल्यांदाच विकेट पडली. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात येताच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी राजीनामा देत असल्याची घोषणा ट्विटर हँडलवरून केली. आंदोलनाच्या गरमागरमीतच उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर समोर आला होता. त्यांची मुलाखत आता प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी जेन झी, जंतरमंतरवरील CJP चे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा यावर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.
त्यांचा संताप उफाळून आला
‘जेन झी’ विषयी उद्धव ठाकरे भरभरून बोलले. कोणी त्यांना झुरळ म्हणाले, काही कॉक्रोच म्हणाले. पण हा जेन झी, तरुण संतप्त झाला. दिल्लीच्या रस्त्यांवर हे तरुण संतप्त होऊन फिरत होते. त्यांचा पोलिसांशी संघर्ष उडालेला होता असे स्पष्ट करतानाच “मुंबईपासून दिल्लीपर्यंत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे, जनता आता भीतीच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत सरकारने एक भीतीची बंदूक त्यांच्या मस्तकावर रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं झुगारून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनता रस्त्यावर उतरली आहे, का उतरणार नाही?” असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी या जेन झीच्या आंदोलनावर केले.
जेन झी का उतरली रस्त्यावर?
जेन झी रस्त्यावर का उतरली असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. 2014 पासून भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला, त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी हे सरकार नकारघंटाच वाजवत आहे. रोजगार मिळताहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महागाई कमी झाली का? पेट्रोलचे भाव उतरले का? गॅसचे दर उतरले का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ सुरू झाली. रस्त्यावर खड्डे पडत आहेत. पूल पडत आहेत. पक्ष फोडले जात आहेत. राम मंदिराची दान पेटी फोडली गेली आहे. लुटली गेली आहे. पेपर फुटत आहेत. म्हणजे या सरकारला कशाचं ही सोयरसुतक उरल नाही. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सरकारने देशाळा बरबाद केले आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सगळे क्रांतीकारी जेन झीचेच
देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणाच्या केलेल्या हेटाळणीचा समाचार उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून घेतला. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्यांनी प्राण दिले. त्यांचं वय किती होतं? ते जेन झीचं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, हे विसरताय का तुम्ही? असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.
एक मुलगी विव्हळून सांगत होती, आक्रोश करत होती. तिच्या मनात उद्वेग होता. तिचे कपडे फाडले गेले. मुलींना मारहाण करण्यात आली. काठीला खिळे लावून अनेकांना मारहाण करण्यात आली. या गर्दीत त्यांनी गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांच्या हातात पोलिसांचे दांडके दिले होते. मुलींना कशा पद्धतीने वागवलं हे क्रौर्य सत्तेच्या माजातून येत असल्याचा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. जंतर मंतरवर देशाचे भाग्यविधाते उभे होते त्यांच्यातील ती हिंमत बघून मलाही वाटलं की, देश जिवंत आहे. हा जिवंतपणा जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत आपल्या देशात हुकूमशाही येऊ शकत नाही. हा एक आत्मविश्वास मला मिळाला, असे या आंदोलनाचे फलित काय ते उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी धर्मेंद्र प्रदान यांच्यावर टीका केली. धर्मेद्र प्रधान असे म्हणतात की, हा जिवंतपणा नसून तरुणांचा अतिरेकीपणा आहे आणि गुंडागर्दी आहे. मग आता त्यांना राजीनामा का द्यावा लागला, या प्रश्नावर ते ‘अ’धर्मेंद्र प्रधान असल्याचा आरोप त्यांनी केला. याच्यात धर्म कुठेय असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर हे लोक खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
Leave a Reply