
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील परिस्थिती, न्यायव्यवस्था आणि सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, सरकारबद्दलच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्याऐवजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायला हवा होता, असेही ठाकरे म्हणाले. आंदोलनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले असते, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. लाठीचार्जदरम्यान गणवेशाविना काही व्यक्ती पोलिसांसोबत दिसत असल्याचा उल्लेख करत त्यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि सरकारविरोधातील नाराजी व्यक्त करण्यासाठी शक्तीप्रदर्शन मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. हा मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply