
मी माझ्या डोळ्याने तो महापूर पाहिला. माझ्या डोळ्यासमोरच माझे मित्र वाहून गेले. प्रलयानंतर प्रेतांचा खच पाहिला. डोंगरावर होतो म्हणून वाचलो. पण त्या भयाण डोंगरावर रात्र जागून काढावी लागली. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मला हा सर्व प्रसंग आजही आठवला तर काळजात धस्स होतं. मी आता पुन्हा कधीच नेपाळला जाणार नाही, नेपाळहून आलेला आशुषोत उपाध्याय हादरवणारा अनुभव सांगत होता. त्याचा हा अनुभव ऐकून अनेकांच्या काळजात धस्स होत होतं. नेपाळचा जलप्रलय पाहून आशुतोष पुरता हादरून गेला आहे. त्या धक्क्यातून तो आजूनही सावरलेला नाही.
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी महाप्रलय आला. अन् नेपाळचं कंबरडंच मोडलं. हजारो लोक मेले. हजारो लोक वाहून गेले ते सापडलेच नाही. अनेक गावं पाण्यात बुडाली. घरे, दारे, इमारती सर्व काही जमीनदोस्त झालं. या महापुरात अनेक देशातील नागरिक अडकले होते. भारताचेही नागरिक अडकले होते. काही नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. गोरखपूरच्या पिपराईचा आशुतोष उपाध्यायही नेपाळहून परतला आहे. पण पूर्वी सारखा राहिलेला नाही. हतबल आणि हताश झालाय. त्याने नेपाळचा तो महाजलप्रलय आपल्या डोळ्याने पाहिला. गोरखपूरला आल्यावर त्याने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले.
अनेक मित्रांसोबत…
याच वर्षी तो मार्चमध्ये नेपाळला गेला होता. रसुआ क्षेत्रात तो राहत होता. या महापुराचा सर्वाधिक फटका बसला. त्याला येथील अमस्ता नावाच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये पाइपलाईन कंपनीत काम मिळालं होतं. तिथेच राहून तो काम करत होता. त्याचे असंख्य मित्र त्याच्यासोबत होते.
अलार्म वाजलाच नाही
आशुतोषच्या मते, त्याच्या काम करण्याच्या ठिकाणाजवळूनच त्रिशुली नदी वाहत होती. आपत्तीच्या काळात सतर्क राहण्यासाठी सायरनची व्यवस्थाही होती. पण 26 ऑगस्ट रोजी असं काय झालं देव जाणे, त्या दिवशी अलार्म ऐकायला मिळालाच नाही. पहाटे 9.30 वाजता अचानक पुराचं पाणी वेगाने आलं. पाहता पाहता परिस्थिती इतकी बिघडली की अनेक लोकांना सावरता आलं नाही. सुरक्षित ठिकाणी जाण्याची त्यांना संधीच मिळाली नाही.
पळा, पळा पाणी आलं…
माझ्या कंपनीचं ऑफिस एका बहुमजली इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर होतं. त्यावेळी अचानक आरडाओरडा ऐकायला आला. पळापळा… पळा पळा… पाणी आलं… हा आरडाओरडा ऐकून आम्ही सर्व मित्र डोंगराच्या दिशेने पळालो. त्यावेळी पाण्याचा वेग अधिकच वाढला. आमचा एक मित्र डोंगरावर चढू शकला नाही. तो माझ्या डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेला, असं तो म्हणाला.
आम्ही मित्राला वाचवण्यासाठी ओरडत होतो. किंचाळत होतो. पण त्यावेळी तिथे मदत करायला कोणीच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर मी काडीकचऱ्यासारखे 25 ते 30 लोक वाहून गेले. आम्ही सर्व पाहत होतो. हताश होतो. काहीच करू शकत नव्हतो, असं तो म्हणाला.
अन् नेटवर्क बंद झालं
महापुरामुळे मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे प्रभावित झालं होतं. कुणाशीही संपर्क होत नव्हता. आम्ही आमच्या कुटुंबीयांशीही फोन करू शकत नव्हतो. इतर लोकांशीही संपर्क होत नव्हता. आम्ही 24 तास त्या डोंगरावर होतो. आमचे सहकारीही डोंगरावरच होते. आमच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हतं. पिण्यासाठी पाणी नव्हतं. आम्ही उपाशीपोटीच होतो. कुणी तरी येईल आणि आम्हाला घेऊन जाईल, याच आशेवर आम्ही तिष्ठत बसलो होतो. 24 तासानंतर अचानक एक हेलिकॉप्टर आलं. त्यानंतर आम्हाला हळूहळू रेस्क्यू करण्यात आलं. आम्हाला काठमांडूला नेण्यात आलं, असं आशुतोषने सांगितलं.
काठमांडूला आल्यावर आम्हाला दिलासा मिळाला. आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही वाचलो… याची जाणीव झाली. मोठा दिलासा मिळाला. त्या जलप्रलयाच्या वेळी कुणाचाच कुणाशी संपर्क होत नव्हता. ऑनलाईन द्वारे आणि फोन द्वारेही बोलता येत नव्हतं. सर्व संपर्क व्यवस्था कोलमडलेली होती, असं तो सांगत होता.
नेपाळ नको रे बाबा…
भारतात आल्यावर आशुतोष खूश होता. परत नेपाळला जाणार का? असं विचारल्यावर त्याने कानाला हात लावला. आता मला नेपाळला जायचं नाहीये. नेपाळशी खूपच वाईट आठवणी जोडलेल्या आहेत, असं तो म्हणतो. मी माझ्या असंख्य सहकाऱ्यांना गमावलं. चारही बाजूने किंकाळ्या घुमत होत्या. पाण्याचा प्रचंड खळखळाट जाणवत होता. एका क्षणात किती तरी घरे, आयुष्य उद्ध्वस्त झाली, असंही त्याने सांगितलं.
कुटुंबाची घालमेल
इकडे आशुतोषच्या कुटुंबीयांची घालमेल झाली होती. मुलाचं काय झालं याची चिंता लागली होती. आशुतोषशी संपर्क होत नसल्याने ही चिंता अधिकच वाढली होती. 26 ऑगस्टच्या सकाळी आशुतोष सोबत बोलणं झालं होतं. तोपर्यंत सर्व ठिक होतं. पण थोड्यावेळाने बातम्या सुरू झाल्या आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही आशुतोषशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण संपर्क होत नव्हता. 26 आणि 27 ऑगस्टची रात्र आमच्यासाठीही जीवघेणीच होती. केवळ आशुतोषची चिंता लागली होती. वारंवार फोन करूनही फोन लागत नव्हता. पण जेव्हा 28 ऑगस्ट रोजी अचानक आशुतोषचा फोन आला. त्याचा आवाज एकून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आशुतोष सुखरूप असल्याची खात्री पटली, असं आशुतोषचे वडील विनोद उपाध्याय सांगत होते.
फोटो पाहून काळजात धस्स
आशुतोषचे वडील 75 वर्षाचे आहेत. नेपाळच्या पुराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून आमच्या काळजात धस्स होत होतं. यात आपला मुलगा तर नाही ना? ही शंका मनात येत होती. मनात पाल चुकचुकत होती. पण जेव्हा आशुतोषशी बोलणं झालं. तेव्हा आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला, असं विनोद उपाध्याय यांनी सांगितलं. नेपाळचा महापूर महाभयानक होता. देवाने कुणावरही ही वेळ आणू नये, असं ते म्हणाले.
Leave a Reply