
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतीला काही प्रमाणात फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी जून महिन्यात अपेक्षित असलेला सातत्यपूर्ण आणि जोरदार पाऊस अद्याप झालेला नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्गातील अनेक भागांत पाऊस सुरू असला तरी नद्या, ओढे आणि तलावांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अनेक ठिकाणी नदीपात्रे आणि जलसाठे अद्यापही कोरडे किंवा कमी पाण्याचे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई आणि खरीप हंगामाबाबत चिंता कायम आहे.
दरम्यान, हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले असून, शेती आणि जलसाठ्यांसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Leave a Reply