
पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयना धरणातून सुमारे 5,079 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील वारणा धरण देखील वेगाने भरत असून, धरणाची पाणीपातळी सध्या 84 टक्क्यांवर पोहोचली आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे वारणा धरणातून 7,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
प्रशासनाने कृष्णा, कोयना आणि वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्राजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास कोयना धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
Leave a Reply