
हजारो -लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत हात घालत पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक झाली असून एसआयटी गठीत करण्यात आली आहे. दानाच्या पैशांच्या अपहार झाल्याचं हे प्रकरण चांगलंच तापलं असून एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. तर याच मुद्यावरून बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा पाच लोकं सहभागी असतात. तेव्हा ती चोरी नसते तो दरोडा असतो. इथे पाच पेक्षा जास्त लोकं आहेत, त्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडलाय असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं. तसेच फक्त देणग्यांवर नव्हे तर प्रभू रामाच्या आभूषणांवरही डल्ला मारला असून ते चोरीला गेले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले राऊत ?
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला, त्यांनी राम मंदिराच्या लुटीविरोधात घोषणा केल्यानंतर मग संघाने भूमिका मांडली. आधी का नाही मांडली ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. या आंदोलनाची ठिणगी पडली तर वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत आहे, असं राऊत म्हणाले. राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा. एक पक्षीय ट्रस्ट नको, हा भाजपचा ट्रस्ट आहे. संघाने भाजपच्या बाजूने बोलू नये. राम भक्तांच्या बाजूने बोलावं. भाजपची कातडी वाचवण्यासाठी संघ स्वत:ची ढाल देत आहे. मुंबईत आंदोलन उद्या आहे. ते महाराष्ट्रात सर्वत्र पसरेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
प्रभु श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. केवळ राम मंदिरातील देणग्यांवर नव्हे तर प्रभू श्रीरामाच्या आभूषणांवरही डल्ला मारण्यात आला. प्रभू रामाचा मुकुट, त्यांचीसर्व आभूषणे, कंठातील हार, सीतामाईची कर्णफुले, सीतामाईच्या गळ्यातील हार, हे चोरीला गेलं आहे. श्रीरामाच्या पादूकाही चोरीला गेल्या, असा आरोप राऊत यांनी केला. तुम्ही म्हणताय संयम आणि धैर्य पाळा. रामाचा मुकुट, सिंहासन आणि कर्णफुले चोरीला जात आहे, आणि तुम्ही म्हणताय संयम पाळा. अब संयम का बांध टुटा है. संयम राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला.
Leave a Reply