
मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून भाजप आमदार अमित साटम यांच्या वर्तनावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवावे, अशीही मागणी त्यांनी केली.
माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “अमित साटम यांना ‘निर्लज्जांचे शिरोमणी’ हा पुरस्कार द्यायला हरकत नाही. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवून त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा.” लोकांच्या भावना दुखावणाऱ्या अशा वर्तनाला सार्वजनिक जीवनात स्थान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशपांडे यांनी पुढे भाजपवर निशाणा साधत, अमित साटम यांना मुंबई भाजप अध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या वर्तनावर पक्षाने कठोर भूमिका घेतली नाही, तर चुकीचा संदेश जनतेमध्ये जाईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, अमित साटम यांच्या कथित हसण्याच्या घटनेवरून मनसेने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी याच मुद्द्यावर अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग आला असून, भाजप यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply