
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असताना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या टप्प्यात एकूण 142 जागांसाठी सुमारे 3 कोटी 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. देशभराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असताना, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “पश्चिम बंगालसारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व असताना त्यांच्या पराभवासाठी मोठ्या प्रमाणावर पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आली आहे. अशा प्रकारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी महाराष्ट्रातील काही निवडणुकांचा उल्लेख करत, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही अशाच पद्धतीने निवडणुका लढवल्या गेल्या,” असा दावा केला. तसेच, “साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर निवडणुकांमध्ये होत असून, प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचा वापर करून दडपशाही केली जात आहे. हा लोकशाहीसाठी धोकादायक प्रकार आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि त्यावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे देशातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply