
नीट पेपरफुटीवरून देशातील तरूणाई भडकली जंतरमंतरवर धाव घेत महिन्याभरापासून आंदोलन सुरू केलं. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणासाठी एकीकडे सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीनेही ठाम भूमिका घेतली. अनेक दिवसानंतर सरकारने त्यांच्याशी चर्चेला सुरूवात केली आणि अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिला. महाराष्ट्रात याच मागणीसाठी आणि दिल्लीतील आंदोलनाला, तरूणाईला सपोर्ट करण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले. उद्या उद्धव व राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन असून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही हा मोर्चा कायम असेल, असं स्पष्ट करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत, आधी या आंदोलनकर्त्यांचे, तरूणाईचे अभिनंदन केले.
त्यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खोचक टीका करतानाच सरकारवर टीकास्त्र सोडलं. ‘ जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे.’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य करत सरकारला सणसणीत टोला लगावला.
जेनझीने सरकारला जमीनीवर आणलं
उद्याच्या मोर्चासाठी शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचं तर जेनझीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला पूर्णपणे जमिनीवर आणलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मला वाटतं हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे. त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवाल उत्तरं देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं, त्याचा जल्लोष झाला पाहिजे असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
हा जो रोष आहे तो प्रधानांवरून पंतप्रधानांपर्यंत पोहोचलं आहे, मी कालच हे म्हटलं होतं. यापुढे अभिजीत दीपके जे निर्णय घेतील , त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असंही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातून पुढचा शिक्षणमंत्री , काय म्हणाले राज ठाकरे ?
या सर्व घटनानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला असून अमित शहांनी मुख्यमंत्री फडणवीसांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतलं आहे. कदाचित महाराष्ट्रामधूनच पुढला शिक्षणमंत्री असू शकतो, या चर्चांवरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. ‘तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला जेवढी बातमी कळली तेवढीच आम्हाला कळली. त्यांच्यात चुरस सुरू आहे. शिंदे जाऊन आले, की फडणवीस दिल्लीला जातात. फडणवीस गेल्यावर शिंदे जातात, असं दिसत असतं. पण आताच्या परिस्थितीत ते तिथे का गेलेत, हे त्यांनी सांगितल्याशिवाय किंवा तिकडे वर काही निर्णय झाल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही’, असं राज ठाकरे म्हणाले. आम्हीपण आत्ताच ही बातमी ऐकली आहे, त्यामुळे आत्ता त्यावर काही बोलण्यात अर्थ नाही, असं त्यांनी सांगितलं.
Leave a Reply